

North Mumbai District BJP MLA Praveen Darekar
मुंबई : पुढारी वृत्तसेवा
प्रत्येक क्षेत्रात आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतःची ओळख निर्माण केली पाहिजे. आपला कार्यकर्ता कारकून किंवा पोस्टमन आहे अशी ओळख होता कामा नये. तो त्याच्या कामाने लीडर असल्याचे वाटले पाहिजे. जोपर्यंत कार्यकर्ता भक्कम होत नाही तोपर्यंत अपेक्षित निकाल मिळणार नाही. येणार्या काळात पक्षाच्या माध्यमातून तसे अभियान सुरु करू, असे प्रतिपादन भाजपचे विधानपरिषद गटनेते आ. प्रवीण दरेकर यांनी येथे केले.
उत्तर मुंबई जिल्ह्याच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘मोदी सरकारची 11 वर्षे’ या कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेला मुंबई भाजपा उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, भाजपा उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष दीपक तावडे, माजी जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, ज्येष्ठ जिल्हा महामंत्री भाभा सिंग, निखिल व्यास, नरेंद्र वर्मा, युनूस खान, महिला जिल्हाध्यक्षा योगिता पाटील, शिवानंद शेट्टी यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरेकर म्हणाले, कुठल्याही पक्षाचे काम गतिमान करण्याची भूमिका सर्वसामान्य कार्यकर्ता निभावत असतो. आपला कार्यकर्ता परिपक्व असला पाहिजे. यासाठी अशी शिबीरे महत्वाची असतात. काही दिवसात आपल्याला महापालिकेच्या निवडणुकीच्या कामाला लागायचे आहे. निवडणुका येतील त्यावेळी भाजपा, कमळ हा एकमेव पर्याय असला पाहिजे हा उद्देश असतो. पदाधिकार्यांनी आपापल्या जबाबदार्या समजून घेऊन काम करण्याची गरज आहे. त्यासाठी प्रत्येक पद महत्वाचे आहे.
दरेकर पुढे म्हणाले, मी राज्यात सहकार आघाडीच्या माध्यमातून शेकडो संस्था उभ्या केल्या. राज्यात महिलांच्या चार हजार सहकारी संस्था केल्या. एका संस्थेत 11 संचालक पकडले तर 44 हजार महिला संचालक झाल्या आहेत. आगामी काळात आ. चित्र वाघ यांच्या नेतृत्वाखाली या महिलांचे फेडरेशन तयार होणार आहे. ते झाल्यावर सरकारची 25 टक्के कामे सहकारी संस्थांना मिळतील. पद कुठलेही असो. पदाची गरिमा , प्रतिष्ठा पदावर काम करणारा कार्यकर्ता वाढवत असतो. त्या पदाच्या माध्यमातून तुम्ही लोकांसाठी काही कराल तरच ते तुमची आठवण काढतील. तुमचे पद प्रत्येक समाज घटकाला माहित पाहिजे, अशा अर्थाने कामे केली तर आपली ओळख निर्माण होते, अन्यथा पदं येतात नी जातात.
दरेकर पुढे म्हणाले की, सुदैवाने केंद्रीय मंत्री पियूष गोयल आपले खासदार आहेत. त्यांनी आजपर्यंत घेतलेल्या बैठकांत 25-25 वर्ष थकलेली कामे, विषय मार्गी लावले. आपली सत्ता केंद्रात आणि राज्यात आहे. त्या सत्तेचा उपयोग कार्यकर्त्यांनी पक्षाच्या माध्यमातून केला पाहिजे. भाजपचा कार्यकर्ता प्रत्येक कार्यक्रमात लोकांना दिसला पाहिजे. जेव्हा असे होईल त्यावेळी भाजपा शिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. येणार्या महापालिका निवडणुकीतही आपल्याला पालिकेवर भाजपचा भगवा फडकवायचाच आहे, असा विश्वासही दरेकर यांनी व्यक्त केला.