कोपरखैरणे: नेरुळ परिसरात चरित्रावर संशय घेत झालेल्या दुहेरी हत्याकांड घडले आहे. २८ वर्षीय तरुणाने कथितरित्या आपल्या पत्नी आणि सासूवर चाकूने हल्ला करून त्यांची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच नेरुळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली. आरोपी पतीचे नाव आयुष निकाळजे असे असून मृत पत्नीचे नाव अपर्णा निकाळजे तर सासूचे नाव मालन गोसावी असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आयुष आणि अपर्णा यांचा सुमारे चार वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना एक मुलगाही आहे. विवाहानंतर हे दाम्पत्य नेरुळ परिसरात राहत होते, तर आरोपीचे कुटुंब मुंबईत राहते.
गेल्या वर्षभरापासून पत्नीच्या चारित्र्यावरून पती-पत्नीमध्ये वाद सुरू असल्याचे सांगितले जात आहे. कौटुंबिक कलह वाढल्यामुळे आरोपी काही काळापूर्वी आपल्या आई-वडिलांकडे राहायला गेला होता. मात्र, तो अधूनमधून पत्नीला भेटण्यासाठी नेरुळ येथे येत असे. प्रत्येक भेटीदरम्यान दोघांमध्ये वाद होत होता.
रविवारी आरोपी पुन्हा पत्नीच्या घरी आला असता, किरकोळ कारणावरून दोघांमध्ये तीव्र शाब्दिक वाद झाला. हा वाद इतका वाढला की संतापाच्या भरात आरोपी आयूषने चाकू काढून पत्नी अपर्णावर सपासप वार केले. अपर्णाला वाचवण्यासाठी धावून आलेली सासू मालनवरही त्याने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दोघींचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
पोलिसांकडून तत्काळ दखल
या घटनेची माहिती मिळताच नेरुळ पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली. सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबल यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात कौटुंबिक वाद व चारित्र्यावर घेतलेला संशय हे हत्येमागील कारण असल्याचेदिसून येत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.