

नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेने केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांर्तगत नवी मुंबई पालिकेने ‘हवे असेल ते घ्या आणि नको असेल ते द्या’ अशी संकल्पना राबवत गरजूंसाठी माणुसकी भिंत उभारली आहे. मात्र या ठिकाणी ठेवण्यात येणार्या कपडयांवर भांडी देणारे आणि वस्तूंवर भंगार विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पालिकेची ही अभिनव योजना बारगळी गेली आहे.
शहरातील मोक्याच्या ६८ ठिकाणी १६ खणांची कपाटे ठेवण्यात आली आहेत. कोणतीही व्यक्ती आवश्यक नसणार्या परंतु सुस्थितीत, वापरण्यायोग्य असणारे शर्ट, पॅन्ट, टी-शर्ट, ब्लँकेट, स्वेटर, सलवार, कमीज, साडी, लहान मुलांचे कपडे, खेळणी, सायकल, चालू स्थितीतील इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिक वस्तू, रुग्णांना वापरण्याजोग्या मेडिकल वस्तू, पॅकिंग खाऊ इत्याी वस्तु या माणुसकीच्या भिंतीला दान करता येतात.
दान केलेल्या वस्तू विकून पैसे
दरम्यान पालिकेने उभारलेल्या या कपाटामध्ये नागरिकांनी दान केलेले कपडे हे कपडे घेऊन भांडी देणारे कपडे विक्रेते निवडून उचलून नेत आहेत. तर रद्दीत टाकण्यात आलेले प्लास्टीक, स्टील, पुस्तके व पेपर, लोखंडी साहित्य भंगार विक्रेते हडप करत आहेत. त्यातच कचरा पेटीतून कचरा गोळा करणारे देखील या कपाटाकडे वळले असून दान केलेल्या वस्तू विकून पैसे मिळवून देणारे साहित्य गोणीत भरुन नेत आहेत. त्यामुळे माणुसकीची भिंत ही भंगारवाले, कपडा व्यापारी आणि इतरांसाठी जणू तिजोरी बनली आहे.