

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अंतर्गत हवाई वाहतुकीला सुरुवातीला मिळालेली गती काहीशी मंदावली असून, जुलैमध्ये विमानांच्या ये-जा करणाऱ्या फेऱ्यांची संख्या दिवसाला सुमारे १०० पर्यंत घसरली आहे.
२५ डिसेंबर रोजी व्यावसायिक विमानसेवा सुरू झाल्यानंतर मे महिन्यापर्यंत विमानतळाच्या हवाई वाहतुकीत सातत्याने वाढ झाली; मात्र जून आणि जुलैमध्ये त्यात घट झाल्याचे चित्र आहे. कच्च्या तेलाचे वाढलेले दर आणि विमान कंपन्यांचा वाढता खर्च यामुळे उड्डाणे घटवण्यात आली आहेत.
जूनमध्ये नवी मुंबई विमानतळावर आगमनाच्या व प्रस्थानाच्या विमानफेऱ्या ३,७०१ नोंदवल्या गेल्या. मे महिन्यातील ४,४८७ फेऱ्यांच्या तुलनेत ही १७% घट आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, दररोजच्या विमानफेऱ्यांचा विचार करता मे महिन्यातील सरासरी १४५ फेऱ्या जूनमध्ये १२३ वर आल्या.
जुलैमध्ये ही संख्या आणखी कमी होऊन दिवसाला सुमारे १०० झाली. व्यावसायिक विमानसेवा सुरू झाल्यानंतर अवघ्या चार महिन्यांत नवी मुंबई विमानतळाने देशांतर्गत हवाई वाहतुकीच्या बाबतीत एप्रिलमध्ये भारतातील टॉप-१० विमानतळांमध्ये स्थान मिळवले होते.
या घसरणीचा संबंध विमान कंपन्यांच्या वाढत्या खर्चाशीही आहे. पश्चिम आशियातील संघर्षामुळे ३० एप्रिल रोजी ब्रेंट क्रूड तेलाचा भाव काही काळासाठी प्रति बॅरल १२६ डॉलरच्या वर गेला. त्याच काळात भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत घसरून २० मे रोजी प्रति डॉलर ९६.९६ या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला.
त्यामुळे विमानांचे टर्बाइन इंधन, विमान भाडे, देखभाल आणि इतर डॉलर-आधारित खर्च महागले. उद्योग क्षेत्रातील एका अधिकाऱ्याच्या मते, अशा वाढत्या खर्चाचा सामना करण्यासाठी विमान कंपन्या विद्यमान प्रमुख विमानतळांवरील उड्डाणे बंद करण्याऐवजी नवीन सुरू केलेली किंवा अतिरिक्त क्षमता कमी करण्याला प्राधान्य देतात. नवी मुंबई विमानतळ आपले नेटवर्क विस्तारत असताना, या कपातीचा फटका त्याला सहन करावा लागला आहे.
दिल्ली : मे महिन्यात ३३,३२५ | जूनमध्ये २९,५८८
मुंबई : मे महिन्यात २०,९७० | जूनमध्ये १८,०७५
नवी मुंबई : मे महिन्यात ४,४८७ | जूनमध्ये ३,७०१
देशातील दोन प्रमुख विमानतळांशी तुलना केली असता हा कल अधिक स्पष्ट दिसतो. आकडेवारीनुसार, मुंबईतील देशांतर्गत विमानफेऱ्या मे महिन्यातील २०,९७० वरून जूनमध्ये १८,०७५ वर आल्या.
दिल्लीतील घट तुलनेने कमी होती—३३,३२५ वरून २९,५८८.
दरम्यान, दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक वर्षभराच्या तुलनेत वाढत राहिली, तर मुंबईतील आंतरराष्ट्रीय वाहतुकीवर पश्चिम आशियातील संगर्षाचा परिणाम झाला. एप्रिलमध्ये आंतरराष्ट्रीय विमानफेऱ्यांमध्ये वार्षिक १७% वाढ झाली होती; मेमध्ये ती १४% आणि जूनमध्ये ७.४% राहिली. यावरून आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीतील वाढीचा वेग कमी झाला.
विमान वाहतुकीतील ही घट काहीअंशी हंगामी स्वरूपाची आहे. जून आणि जुलै हे विमान प्रवासासाठी साधारणपणे कमी मागणीचे महिने मानले जातात. ऑगस्टच्या मध्यातील दीर्घ सप्ताहाखेरपासून प्रवाशांची मागणी वाढू लागते आणि सणासुदीचा हंगाम सुरू होताच विमान वाहतुकीला पुन्हा वेग मिळतो. त्यामुळे नवी मुंबई विमानतळावरील सध्याची घसरण ही वाढता खर्च, पश्चिम आशियातील परिस्थिती आणि हंगामी मागणीतील घट या तिन्ही घटकांचा एकत्रित परिणाम असल्याचे चित्र दिसते.