

मुंबई: मुंबईत थंडीची चाहूल लागली असून थंडीमध्ये होणारे वायू प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. प्रदूषण रोखण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या मार्गदर्शक तत्वांचा तंतोतंत पालन करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.
हिवाळ्यात वाऱ्याचा कमी वेग व कमी तापमान यामुळे नैसर्गिक वायुवीजन कमी होते. त्याशिवाय थंडीच्या कालावधीत कोरडे वारे आणि ढगाळ हवामान या कारणांमुळे वायू प्रदूषणात वाढ होते. वातावरणीय बदलांमुळे हवेच्या दर्जात होणारे बदल, त्यातून जनजीवनावर होणारे विपरीत परिणाम लक्षात घेऊन, प्रदूषण रोखण्यासाठी सत्य अस्तित्वात असलेल्या कार्यपद्धतीसह उपाययोजनांच्या अंमलबजावणीवर भर दिला जाणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. वायु प्रदूषण रोखण्यासाठी बनवण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वाचे तंतोतत पालन करण्यासाठी पालिकेची विशेष मोहिम हाती घेण्यात येणार आहे.
बांधकामामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाय योजना हाती घेण्यात आल्या आहेत. इमारतीला चहूबाजूंनी हिरवे कापड, ज्युट, ताडपत्रीने पूर्णपणे झाकून बंदिस्त करणे, बांधकाम प्रकल्पाभोवती किमान २५ फूट उंचीचा पत्रा उभारणे, सातत्याने पाणी फवारणी, मिस्टिंग संयंत्राचा वापर, इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी तयार होणाऱ्या डेब्रिजची साठवण व ने-आण करताना विशेष आच्छादन करणे, हवेच्या गुणवत्तेचे निरिक्षण करणारे सेन्सर लावणे आणि वाहनांची चाके धुणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याशिवाय वाहनांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी रस्ते धुण्यावरही भर देण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
* धावणे, जॉगिंग व कठोर शारीरिक व्यायाम श्रम टाळावेत.
सिगारेट, बिडी आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करू नये.
* घरामध्ये स्वच्छता करताना झाडू मारणे ऐवजी ओल्या फडक्याचा वापर करावा.
* बंद घरामध्ये डासांच्या कॉइल, अगरबत्ती जाळणे टाळावे.
निरोगी आहार फळे, भाज्या आणि पाणी इत्यादींचे सेवन करावे.
* श्वसनाचा त्रास, चक्कर येणे, खोकला, छातीत अस्वस्थता किंवा वेदना असल्यास जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
* प्रदूषण कालावधीत घराबाहेर जायचे असल्यास डिस्पोजेबल मास्कचा वापर करावा.