

मुंबई: मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांनी आता तळ गाठला आहे. जेमतेम 17 टक्के म्हणजे 2 लाख 48 हजार दशलक्ष लिटर इतकाच पाणीसाठा तलावांत शिल्लक आहे. भातसा तलावातही जेमतेम 16 टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. हा साठा मुंबईकरांना आणखी 40 दिवस पुरू शकतो. मात्र पाण्याचे होणारे बाष्पीभवन पाहता मुंबईकरांची पाणीचिंता आणखी वाढणार आहे.
तलावांतील पाणीसाठ्यात घट झाल्यामुळे मुंबईत सध्या 10 टक्के पाणी कपात लागू आहे. यातून दररोज 400 दशलक्ष लिटर पाण्याची बचत होत असली तरी, तापमानात झालेली वाढ यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचे बाष्पीभवन होत आहे.
त्यामुळे 14 लाख 47 हजार दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता असलेल्या सातही तलावांमध्ये गुरुवारी (28 मे रोजी) फक्त 2 लाख 48 हजार दशलक्ष लिटर इतकाच पाणीसाठा शिल्लक होता. टक्केवारीत हा 17 टक्के इतका आहे. पाऊस पडेपर्यंत हे पाणी पुरवायचे कसे असा प्रश्न मुंबई महानगरपालिके समोर आहे.
40 दिवस पुरेल इतका पाणीसाठा!
सातही तलावांत 17 टक्के म्हणजे 2 लाख 48 हजार दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा शिल्लक आहे. दहा टक्के पाणी कपात लागू करण्यात आल्यामुळे सध्या दररोज 3,650 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. त्याशिवाय ठाणे व भिवंडी शहराला दररोज 150 दशलक्ष लिटर. हे लक्षात घेता शिल्लक साठा 40 दिवस पुरेल इतका आहे.
अप्पर वैतरणा तलाव आटला
नाशिक जिल्ह्यातील राज्य सरकारचा अप्पर वैतरणात तलाव जवळपास पूर्णपणे आटला असून या तलावामध्ये 2.76 टक्के म्हणजे 6,270 दशलक्ष लिटर इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे या तलावातून मुंबई शहराला होणारा पाणीपुरवठा लवकरच बंद होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
तलावातील पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)
अप्पर वैतरणा : 6,270 (2.76%)
मोडक सागर : 44,195 (34.28%)
तानसा : 17,875, (12.32%)
मध्य वैतरणा : 46,050 (23.79%)
भातसा : 1,18,381 (16.51%)
विहार : 13,070 (47.19%)
तुळशी : 2,292 (28.48%