

मुंबई : साथीच्या आजाराबरोबरच आता मुंबईमध्ये 'व्हायरल इन्फेक्शनचे रुग्ण वाढले आहेत. सर्दी, ताप, घशात खवखव व खोकल्याचा त्रास होत आहे. प्रत्येक रुग्णालयात ३० ते ४० टक्के रुग्ण याच लक्षणाचे येत आहेत. सरकारी रुग्णालयांपासून ते स्थानिक दवाखान्यांपर्यंत सगळीकडेच गर्दी आहे.
व्हायरल इन्फेक्शनची सुरुवात सर्दी, शिंका, ताप आणि घशातील खवखव या लक्षणांपासून होते. मात्र, योग्य व वेळेत उपचार न केल्यास पुढे जाऊन ब्रॉन्कायटिस, न्यूमोनिया, अथवा घशात जळजळ व सूज अशा गंभीर आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. काही रुग्णांना डोकेदुखी, अंगदुखी व सततचा थकवा देखील जाणवत आहे.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आधीपासूनच अस्थमा, सायनस अथवा हृदयविकाराचे रुग्ण यांना या हवामान बदलाच्या काळात धोका अधिक असतो. त्यांच्या रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे त्यांना संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. गरज नसताना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, मास्क वापरा, हात स्वच्छ धुवा, आणि पुरेशी झोप व पोषक आहार घ्या, असे आरोग्य विभागाने सांगितले आहे.
या आजराची लक्षणे दिसताच विशेष करून ज्यांना सहव्याधी आहेत त्यांनी घरगुती उपायांवर अवलंबून न राहता तातडीने डॉक्टरांचा सल्ला प्यावा.
डॉ. अखिलेश यादव, जनरल फिजिशियन
सध्या वातावरणातील बदल आणि आर्द्रता यामुळे व्हायरल इन्फेक्शनचे प्रमाण वाढत आहे. सर्दी-तापाला सामान्य समजून दुर्लक्ष करू नका. विशेषतः खोकला सातत्याने होत असेल, तर तो फुप्फुसांवर परिणाम करणारा असू शकतो. सध्या बाड़ा रुग्ण विभागात अशा लक्षांचे रुग्ण अधिक प्रमाणात दिसून येत आहे.
डॉ. विनायक सावडेकर, सेंट जॉर्जेस रुग्णालय