

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
मुंबई विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या विधी अभ्यासक्रमांच्या परीक्षेत पुन्हा गोंधळ समोर आला आहे. महाविद्यालयांमध्ये या परीक्षांदरम्यान चुकीची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देण्याच्या घटना घडल्या आहेत. यापैकी पहिली घटना ८ एप्रिल रोजी घडली, तर दुसरी घटना शनिवारी घडली. विद्यापीठाच्या कारभारावर विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
चेंबुरच्या एका महाविद्यालयात शनिवारी विधी तीन वर्षे अभ्यासक्रमाच्या सहाव्या सत्राची आणि पाच वर्षे अभ्यासक्रमाच्या दहाव्या सत्राची परीक्षा सुरू होती. भारतीय साक्ष अधिनियम या विषयाचा पेपर या विद्यार्थ्यांना मिळणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात त्यांना कालबाह्य झालेल्या पुरावाविषयक कायदा या विषयाची प्रश्नपत्रिका देण्यात आली. आम्ही सुधारित अभ्यासक्रमाप्रमाणे अभ्यास केला असताना परीक्षेच्या वेळी महाविद्यालयाने आम्हाला जुन्या अभ्यासक्रमावर आधारीत प्रश्नपत्रिका दिली. त्यामुळे आमचा गोंधळ उडाल्याचे एका विद्यार्थ्याने सांगितले. विद्यार्थ्यांनी ज्या अभ्यासक्रमावरून तयारी केली होती, त्यापैकी काहीच प्रश्न या प्रश्नपत्रिकेत नव्हते. याप्रकरणी विद्यार्थ्यांचा अर्धा तास वाया गेला. विद्यापीठाने विद्यार्थ्यांना अर्धा तास वाढवून दिला असला, तरी मानसिक तणावाचा सामना विद्यार्थ्यांना करावाच लागला. असे प्रकार वारंवार घडत गेले तर याला जबाबदार कोण, असा सवालही उपस्थित केला आहे.
विद्यापीठाचा दरवेळेला होणारा गोंधळ हा विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागणारा आहे. याप्रकरणी विद्यापीठ प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी.
- अॅड. सचिन पवार, उपसचिव, युवासेना