

Mumbai Tiranga Rally : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आज (दि.२६) ठाकरे बंधूंच्या (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) वतीने भव्य 'जल्लोष सभेचे' आयोजन करण्यात आले होते. या जल्लोष सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी परिधान केलेला अनोखा टी-शर्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. या टी-शर्टच्या माध्यमातून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला.
विद्यार्थ्यांच्या (जेन-झी) तीव्र आंदोलनानंतर अखेर शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. या ऐतिहासिक विजयाचे स्वागत करण्यासाठी आज शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंच्या वतीने जल्लोष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत संदीप देशपांडे यांच्या टी-शर्टचीच सर्वाधिक चर्चा रंगली होती.
यावेळी 'पुढारी न्यूज'शी बोलताना देशपांडे यांनी या टी-शर्टमागील भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, "निश्चितच, मला असं वाटतं की या आंदोलनातनं सर्वात मोठा टेक-अवे (Takeaway) हाच आहे की, सरकारबद्दल असलेली भीती या मुलांनी घालवलेली आहे. टी-शर्टबद्दल म्हणाल, तर जेन-झींनी ज्या पद्धतीने आंदोलन केलं, त्यांची वेगवेगळी पोस्टर्स होती; त्यातनंच प्रेरणा घेऊन बनवलेला हा टी-शर्ट आहे."
"आजचा जो विजयाचा जल्लोष आहे, तो त्या मुलांचा जल्लोष आहे आणि त्याच्यात आम्ही फक्त सामील होणार आहोत. कॉकरोच जनता पार्टीचं तुम्ही बघताय. आंदोलन कशा नव्या पद्धतीने करावं याची प्रेरणा सर्वच राजकीय पक्षांनी या जेन-झींकडून घेतली पाहिजे. आंदोलन म्हणजे फक्त सिरिअस गोष्टी किंवा गंभीर वातावरण नाही, तर आंदोलन हासुद्धा लोकशाहीचा एक उत्सव आहे. नुसत्या निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव नाही, तर आंदोलन हासुद्धा लोकशाहीचा उत्सव आहे, हा मला वाटतं या आंदोलनातला सर्वात मोठा संदेश आहे," असेही देशपांडे यांनी नमूद केले.