

मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आठवड्याअखेर तापमान पस्तीशीखाली कायम असल्याचे भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. सांताक्रुझ वेधशाळेमध्ये शनिवारी किमान 23 आणि कमाल 33 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
यंदाच्या आठवड्यात सरासरी कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस राहिले. रविवारीही त्याचीच पुनरावृत्ती अपेक्षित आहे. मात्र, सोमवारपासून त्यात घट होण्याची शक्यता आहे. तापमान पस्तीशीखाली असले तरी आर्द्रतेचे प्रमाण 77 टक्के असल्याने हवेमध्ये उकाडा कायम आहे. सकाळी आणि संध्याकाळी थंडावा वाटत आहे. मात्र, दुपारी उन्हाचा तडाखा जाणवत आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, हवेमध्ये ओलावा जास्त असतो, तेव्हा कोरडे वारे वाहत नाहीत. परिणामी वातावरण अधिक दमट बनते आणि घाम येण्याचे प्रमाण वाढते. मुंबईमध्ये सध्या कमाल तापमान सरासरी 33 अंश सेल्सिअस असले तरी आर्द्रतेमुळे ते अधिक जाणवत आहे.