

Mumbai missing children news
मुंबई : मुंबई शहरातून गेल्या ३६ तासांत १२ अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आले असतानाच यावर मुंबई पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे. बेपत्ता आणि अपहरण झालेल्या मुलांबाबत चुकीची माहिती व अफवा पसरवली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
दरम्यान, मुंबईत मानव तस्करी करणाऱ्या संघटीत टोळ्या सक्रिय असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पालकांच्या तक्रारींवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १३७ (२) अंतर्गत १२ अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बेपत्ता मुलांची ठिकाणे
शिवाजी नगरः ४ मुले
साकीनाकाः २ मुले
अँटॉप हिल: २ मुले
ओशिवरा, मानखुर्द, बांगूर नगर आणि घाटकोपरः प्रत्येकी १ मुले
पालकांकडून आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे खंडणीचे कॉल आलेले नसल्याचा दावाही केला जात होता.
सोशल मीडियावर मुंबई पोलिसांच्या अधिकृत अकाऊंटवरुन या वृत्ताबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. 'सोशल मीडियावरील काही अकाऊंट्सवरुन बेपत्ता आणि अपहरण झालेल्या मुलांबाबत चुकीची माहिती व अफवा पसरवली जात आहे. आम्ही या दाव्यांचे पूर्णपणे खंडन करतो. या संदर्भात मुद्दाम खोटी माहिती पसरवून जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे (FIR) नोंदवण्यासह कठोर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत अल्पवयीन मुलांच्या बेपत्ता होण्याच्या घटना वाढल्या आहेत. जून ते डिसेंबर २०२५ या काळात १४५ मुले बेपत्ता झाली होती, त्यापैकी ९३ मुली होत्या. विशेषतः १ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या ३६ दिवसांत ८२ जण बेपत्ता झाल्याची नोंद आहे, ज्यात निम्म्याहून अधिक मुली होत्या (४१ मुली आणि १३ मुले).