मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : रेल्वेचे तिकीट बूक न होता खात्यातून गेलेले अवघे ५७८ रुपये परत मिळविण्यासाठी गुगलवर आयआरसीटीसीचा हेल्पलाईन क्रमांक शोधून त्यावर कॉल करणे एका शिक्षकाला चांगलेच महागात पडले आहे. सायबर ठगाने ५७८ रुपये रिफंड करण्याच्या बहाण्याने या शिक्षकाच्या खात्यातील पावणे दोन लाखांवर ऑनलाईन डल्ला मारला आहे. याप्रकरणी फसवणूकीचा गुन्हा दाखल करुन ताडदेव पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
ताडदेवमध्ये राहत असलेल्या यातील तक्रारदार अलीअजगर (वय ३२) यांचा शिकवणी घेण्याचा व्यवसाय आहे. नाशिक येथे जायचे असल्याने अलीअजगर यांनी २२ मे रोजी आयआरसीटीसी अॅप्लीकेशनच्या माध्यमातून रेल्वेचे तिकीट काढण्याचा प्रयत्न केला. मात्र रेल्वेचे तिकीट बूक झाले नाही. परंतू खात्यातून ५७८ रुपये वजा झाले होते. याबाबत मॅसेज आल्याने अलीअजगर यांनी गुगलवर आयआरसीटीसी हेल्पलाईन क्रमांक शोधला. मिळालेल्या क्रमांकावर अलीअजगर यांनी कॉल केला. मात्र फोन व्यस्त लागत होता. अलीअजगर यांना काही वेळात एका अनोळखी नंबरवरुन कॉल आला.
आयआरसीटीसीच्या वांद्रे कार्यालयातून बोलत असल्याचे सांगत त्याने पैसे रिफंड मिळतील अशी बतावणी केली. पूढे त्याने एका मोबाईल क्रमांकावर एक एसएमएस करण्यास सांगितले. मात्र हा एसएमएस जात नसल्याने त्याने एक लिंक ओपन करुन तपासण्यास सांगितली. तसेच बँक खात्याशी संबंधीत अॅप उघडण्यास सांगून अलीअजगर यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बँक खात्यावरुन गुगल पे च्या माध्यमातून ९४ हजार १४४ रुपये, एचडीएफसी खात्यावरुन ६४ हजार आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यावरुन २० हजार रुपयांची ऑनलाईन शॉपिंग करुन एकूण ०१ लाख ७८ हजार रुपयांवर ऑनलाईन डल्ला मारला. सायबर ठगाने ऑनलाईन पेमेंटद्वारे १० व्यवहार करुन त्यांच्या खात्यातून ही रक्कम लंपास केली होती. त्यानंतर मात्र आपली फसवणूक झाल्याची अजगर अली यांची खात्री पटली. अखेर त्यांनी ताडदेव पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे.