

मुंबई: मुंबईत सध्या उष्णतेची लाट आहे. पुढील दोन दिवसांमध्ये त्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) गुरुवार ते शुक्रवार असा सलग तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. सांताक्रूझ वेधशाळेमध्ये गुरुवारी किमान 25 आणि कमाल 37 अंश सेल्सिअस तापमान होते. बुधवारच्या तुलनेत कमाल तापमानात दोन अंशांनी वाढ झाली. तापमानात वाढ झाल्याने सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत कमालीचा उकाडा जाणवत आहे.
शुक्रवारी (38 अंश सेल्सिअस) पारा आणखी वर जाण्याची शक्यता आयएमडीने वर्तविली आहे. शनिवारी (36 अंश सेल्सिअस) त्यात थोडी घट होण्याचा अंदाज आहे.
पुढील दोन दिवसांमध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह तुरळक पाऊस पडेल. रविवारपासून कमाल तापमानात थोडी घट होऊन उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी होईल, असे आयएमडीच्या साप्ताहिक फोरकास्टमध्ये सांगण्यात आले आहे.
तापमानाचा आलेख
काल - 37 अंश सेल्सिअस
आज - 38 अंश सेल्सिअस
उद्या - 36 अंश सेल्सिअस