

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेने उभारलेला महत्त्वाकांक्षी प्रकल्प धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) हा वाहतुकीसाठी टप्प्याटप्प्याने खुला करण्यात आला आहे. आता वाहनचालक व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या मार्गावर ठिकठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण असलेले 236 सीसीटीव्ही कॅमेरे पालिकेने बसवले आहेत.
यामुळे या मार्गावर कोठेही अपघात झाला तर नियंत्रण कक्षाला त्याची त्वरित माहिती मिळते आणि अपघातग्रस्तांना तत्काळ मदत उपलब्ध होत आहे. दिवसभरात किती वाहनांनी या मार्गाचा वापर केला, त्या वाहनांचे प्रकार कोणते, किती वाहनांनी वेगाची मर्यादा ओलांडली, याचीही नोंद या कॅमेरा प्रणालीमुळे ठेवण्यात येत आहे. मुंबईकरांना जलद, सुलभ आणि सुरक्षित वाहतूक सुविधा उपलब्ध व्हावी, हा दीर्घकालीन दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबई किनारी रस्ता प्रकल्प उभारला आहे.
शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट) उड्डाणपूल ते वरळी-वांद्रे सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाची लांबी 10.58 किलोमीटर इतकी आहे. या प्रकल्पावर दोन्ही बाजूने वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण प्रकल्पावर ठिकठिकाणी विविध प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल) ते वरळी वांद्रे सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत चार प्रकारचे वैशिष्ट्य असलेले, एकूण 236 सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित झाले आहेत.
दोन्ही बोगद्यांमधील आंतरमार्गिकांजवळ प्रत्येकी 50 मीटर अंतरावर अपघात ओळखणारे 154 कॅमेरे बसविण्यात आले आहेत. अपघात, चुकीच्या दिशेने जाणारी वाहने इत्यादी घटनांची हे कॅमेरे आपोआप ओळख करतात. नियंत्रण कक्षाला तत्काळ सूचना देतात.
या ठिकाणी वाहतूक करणार्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि अशी वाहने ओळखण्यासाठी सात कॅमेरे बसविण्यात आले आहेत. वेग मर्यादा ओलांडणार्या वाहनांची छायाचित्रे व त्यांच्या वाहन क्रमांकाची (नंबर प्लेट) नोंद हे कॅमेरे करतात.
मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील भूमिगत बोगद्यांचे प्रवेशद्वार व निर्गमद्वारावर एकूण चार कॅमेरे बसविण्यात आले आहेत. भूमिगत बोगद्यांमध्ये जाणार्या वाहनांची संख्या मोजणे, त्यांचे वर्गीकरण करणे, यासाठी हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
वाहतूक सुरक्षेसाठी 71 निगराणी कॅमेरे बसविले आहेत. हे कॅमेरे फिरवता, झुकवता व झूम करता येतात. जेव्हा एखादा अपघात होतो तेव्हा या कॅमेर्यामधील व्हीआयडीएस प्रणाली स्वयंचलित पद्धतीने सदर घटना ओळखते आणि आपोआप त्या घटनेकडे लक्ष केंद्रित करते. दोन्ही भूमिगत बोगद्यांमध्ये असे 71 कॅमेरे बसविण्यात आले आहेत.