मुंबई : विविध गुंतवणूक योजनांसह चीट फंडच्या नावाने एका टोळीने अनेकांना १ कोटी ४२ लाखांना गंडा घालून पलायन केल्याची घटना एण्टॉप हिल परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी एकाच कुटुंबातील चौघांविरुद्ध वडाळा टी टी पोलिसांनी अपहारासह फसवणूक तसेच चीट फंड, महाराष्ट्र ठेवीदारांच्या अधिनियम कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मोहम्मद रज्जाक कुर्बान अन्सारी, मुस्ताक अन्सारी, मेहरुन अन्सारी व कायनात अन्सारी अशी या चौघांची नावे आहेत. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच चारही आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंतच्या तक्रार अर्जांवरुन ही फसवणूक १ कोटी ४२ लाखांची असली तरी फसवणुकीचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
३९ वर्षांची तक्रारदार महिला वडाळ्यातील एण्टॉप हिल परिसरात राहते. तिचे पती एका गारमेंटमध्ये कामाला असून तिथेच अतिरिक्त ओव्हरटाईम करत असल्याने त्यांना सध्या ४० हजार वेतन मिळते. मोहम्मद रजाक हा त्यांच्या गावचा रहिेवासी असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. तो सध्या एण्टॉप हिल येथे राहत असून गारमेंटमध्ये काम करतो. त्यामुळे तिचे पती व मोहम्मद रज्जाकची नियमित भेट होत होती. एकाच गावचे रहिवासी असल्याने त्यांच्यात कौटुंबिक संबंध होते.
२०२१ साली त्याने तिच्या पतीला एक गुंतवणूक योजना सांगितली होती. या योजनेत एक ठराविक रक्कम जमा केल्यानंतर दोन वर्षांनंतर त्यांना चांगल्या परताव्यासह गुंतवणूक रक्कम मिळणार होती. त्यामुळे तिच्या पतीने २४ महिने त्याच्याकडे दरमाह पंधरा हजार जमा करण्यास सुरुवात केली. २०२३ साली त्याने त्यांना शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. या गुंतवणुकीवर त्यांना कमीत कमी दहा टक्के परतावा देण्याचे आश्वासन देऊन त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी शेअरमध्ये काही रक्कम गुंतवली.
याच दरम्यान त्यांना मोहम्मद रज्जाक हा इतरांच्या मदतीने भिसी चालवत असल्याचे समजले. या भिसीमध्येही त्याने त्यांना गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे त्यांनी तिथेही गुंतवणूक केली. डिसेंबर २०२३ पर्यंत त्यांनी वेगवेगळ्या गुंतवणूक योजनांसह भिसीमध्ये सहा लाखांची गुंतवणूक केली होती. याकामी त्याला मुस्ताक अन्सारी, मेहरुन अन्सारी व कायनात अन्सारी हे तिघेही मदत करत होते.
एप्रिल २०२६ च्या दुसर्या आठवड्यात मोहम्मद रज्जाक हा त्याची पत्नी मेहरुन व मुलगी कायनात यांच्यासोबत एण्टॉप हिल येथून अचानक पळून गेला होता. त्यांनी त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होऊ शकला नाही. चौकशीअंती तक्रारदार महिलेला मोहम्मद रज्जाकने त्याच्या इतर सहकार्यांच्या मदतीने तिच्यासह तिचे पती व अनेकांना वेगवेगळ्या गुंतवणूक योजना तसेच भिसीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले होते. या सर्वांकडून १ कोटी ४२ लाख ७४ हजार रुपये घेऊन कोणालाही मूळ रकमेसह परतावा न देता पळून गेला होता.
फसवणुकीचा हा प्रकार समजताच संबंधित् लोकांनी वडाळा पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रार अर्जानंतर पोलिसांनी मोहम्मद रज्जाक अन्सरी, मुस्ताक अन्सारी, मेहरुन अन्सारी व कायनात अन्सारी अशा चारही आरोपींविरुद्ध चिेट फंड, महाराष्ट्र ठेवीदाराच्या अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. चारही आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.