

Mrinaltai Gore flyover Melting: मंबईत नुकतेच मृणालताई गोरे उड्डाणपुलाचे उद्घाटन झालं आहे. मात्र हा उड्डाण पूल सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र ही चर्चा योग्य कारणासाठी नाहीये. ७५० मीरटचा फ्लाय ओव्हरचे बांधकाम २०१९ मध्ये सुरू झाले होते. तो आता पूर्ण झाला असून त्यासाठी २४७.९७ कोटी रूपये खर्च आला आहे. हा उड्डाण पूल गोरेगाव मुलूंड लिंक रोडला कोस्टल रोडशी जोडतो.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत या उड्डाण पुलावरील वरचा स्तर वितळत आहे असं दिसतं. काही ठिकाणी तर दुचाकीच्या स्टँडने रस्ता खाली दबत आहे असं दिसत आहे. यामुळं लोकांनी संताप व्यक्त केला असून याची जबाबादारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मात्र ही मागणी खरोखरच योग्य आहे का? जाणकारांच्या मते रस्त्यावरील वरचा स्तर वितळणे धोकादायक आहे किंवा निकृष्ट कामाचं प्रतिक आहे का हे जाणून घेऊयात.
व्हिडिओत उड्डाण पुलावरील वरचा थर वितळत आहे असं दिसतं. हा वरचा थर हा डांबराचा आहे. हा रस्ता तयार करताना डांबर वरून ओतून ते सेट केलं जातं. उच्च तापमानाला डांबर (bitumen) मऊ पडतं ते मेल्ट झाल्यासारखं देखील वाटतं. सध्याच्या घडीला मुंबईतील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे त्यामुळं रस्त्यावरील डांबराचा वरचा लेअर वितळत आहे. ही अत्यंत सामान्य गोष्ट असल्याचं मत आर्किटेक्चर अर्बन प्लॅनर पंकज जोशी यांनी सांगितलं.
तसेच रस्त्यावर दिसणारी बारीक खडी म्हणजे देखील निकृष्ट दर्जाचं काम असं नाही. ही बारीक खडी डांबरावर मुद्दाम पसरलेली असते. यामुळं घर्षण तयार होऊन गाड्या डांबरावरून घसरत नाहीत. ज्यावेळी या रस्त्यावरून वाहनांची वर्दळ वाढेल तसतसे ही खडी हळूहळू पृष्ठभागाच्या आत जाईल. ही बारीक खडी मिश्रित पावडर टाकण्याचा उद्येश हा रस्ता खूप गुळगुळीत होऊ नये आणि वाहने घसरू नयेत म्हणून टाकलेली असते.
जोशी यांनी हे देखील सांगितलं की डांबराची जितकी गरज होती त्यापेक्षा थोडं जास्त डांबर वापरण्यात आलं आहे असं देखील सांगितलं. त्यामुळं उष्णतेच्या दिवसात ते अधिक मऊ पडलं आहे.
मृणालताई गोरे उड्डाण पुलावर अनेक वळणे आहेत. त्यामुळं घर्षण हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. आर्किटेक्ट आदित्य शेनई यांनी सांगितलं की या सारख्या पुलांवर उच्च घर्षण असलेला पृष्ठभागाला दुसरा पर्याय नाही. मुंबईत प्रचंड पाऊस पडतो. त्यामुळं असा घर्षणयुक्त रोड असणं खूप गरजेचं आहे. ज्या पुलांवर वळणे आहेत तिथं उच्च संघर्ष असलेले रोड असणे क्रमप्राप्त आहे.
व्हायर व्हिडिओवरून उड्डाण पूलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे आहे असा निष्कर्ष काढणं घाईचं ठरले. बीएमसीने सध्याच्या परिस्थितीत रस्ता निकृष्ट दर्जाचा आहे असं दिसत नाही. जाणकारांच्या मते जे काही दिसत आहे ते उष्णता वाढल्यानंतर डांबर जी प्रतिक्रिया करते ते आहे. ही सामान्य प्रतिक्रिया आहे.
असं असलं तरी ज्यावेळी मुंबईत पाऊस पडेल त्यावेळी या रस्त्याच्या कामाची खरी परीक्षा होणार आहे. जर निकृष्ट डांबराने हा रस्ता केला असेल तर तो पावसात वाहून जाईल असं देखील जोशी यांनी सांगितलं.