

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने २४८ कोटी रुपये खर्च करून बांधलेला गोरेगाव येथील मृणालताई गोरे उड्डाणपूल आता वादात अडकला आहे. येथील उड्डाणपुलावरील मार्ग निसरडा झाल्याने शुक्रवारी दिवसभर अपघाताची मालिका सुरु होती.
शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारांस उड्डाणपूलाच्या वळणावर एका ट्रकने संरक्षण भितीला धडक दिल्याने ध्वनी रोधक कठडे थेट खाली पडले. यानंतर उड्डाणपूलावरून वळण घेतांना ८ ते १० दुचाकी घसल्याच्या घटना शुक्रवारी घडल्या. यामुळे उड्डाणपूल बांधणीसाठी नियुक्त केलेल्या सल्लागार, अभियंते आणि कंत्राटदार यांच्या कामांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
येथील मृणालताई गोरे विस्तारीकरण उड्डाणपूलाचे जून २०२६ रोजी महापौर रितू तावडे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले होते. मात्र अवघ्या ४ महिन्यानंतर सदर उड्डाणपूलाच्या कामाच्या दर्जावर प्रश्चचिन्ह उपस्थित झाले आहेत.
यामुळे उड्डाणपूलावरून जाणाऱ्या वाहनचालकांची सुरक्षा धोक्यात आली असून सदर उड्डाणपूलाच्या कामाचे आॅडिट करण्याची मागणी वाहनचालक मनोज यादव यांनी केली आहे. तसेच संबंधित कंत्राटदार आणि अभियंत्यावरसुद्धा कारवाई करण्याची विनंती त्यांनी यावेळी केली.
गोरेगाव (पश्चिम) येथील राम मंदिर मार्ग ते रिलीफ रोडदरम्यान मृणालताई गोरे उड्डाणपुलाचा विस्तार करण्यात आला आहे. यामुळे राम मंदिर मार्ग ते रिलीफ रोड दरम्यान ३० मिनिटांचा प्रवास आता १० मिनिटांत करणे शक्य झाले आहे. मात्र घाई-घाईने केलेले काम आणि कंत्राटदाराला दिलेला वाढीव निधी यामुळे पालिकेच्या कारभारावर आता मुंबइकरांकडून टिका केली जावू लागली आहे.
२४८ कोटींचा खर्च
मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणात वालभट नदीवरील विद्यमान पूल पाडून पुनर्बांधणी करण्यात आली. तसेच, विद्यमान रेल्वे उड्डाणपुलाचे विस्तार कामाशी एकत्रीकरण, अंदाजे ४५० मीटर लांबीच्या (२+२ मार्गिका) पोहोच मार्गाचे सुधारीकरण करण्यात आले आहे. विस्तारित पुलाची एकूण लांबी ७५० मीटर असून रुंदी १५.५० मीटर (२+२ मार्गिका) अशी आहे. ७५० मीटर लांबीच्या या उड्डाणपुलासाठी २४८ कोटी रुपये खर्च झाले.
म्हणजे प्रति मीटर सुमारे ३३ लाख रुपये खर्च झाले. तरीही उद्घाटनाच्या दिवशीच पुलावर खड्डे होते. अशी टीका त्यांनी केली. सात वर्षे विलंब, वाढलेला खर्च आणि ठेकेदारावर दंडात्मक कारवाई झाल्यानंतरही अशी अवस्था का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.