

मुंबई : फैयाज प्रेमजी (वय ३९) या माथेफिरूने वाटलेल्या विषारी गोळ्या वेदनाशामक म्हणून खाल्ल्या असत्या, तर शुक्रवारी भायखळ्यात निघालेल्या मोहरमच्या मिरवणुकीत सहभागी झालेले किमान ३० हजार लोक जीवाला मुकले असते. वेदनाशामक गाेळ्यांच्या नावाखाली उंदीर मारण्याच्या गोळ्यांचे (झिंक फॉस्फाईट) वाटप करून मोठा घातपाताचा हा कट मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला.
इराण, इराकचे दौरे करून आलेल्या फैयाजला पोलिसांनी गजाआड केले असून त्याच्याकडून तब्बल ५० किलो म्हणजे १५ हजार गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. याशिवाय, आणखी १५ हजार गोळ्यांची तयारी त्याने करून ठेवली होती. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि किमान ३० हजार लोक शांतपणे ठार करण्याचे आपले इरादेही त्याने मान्य केले. हा वेगळ्या प्रकारचा दहशतवाद असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून त्या दिशेने तपास यंत्रणा कामाला लागल्या आहेत.
वेळीच हा प्रकार रोखला गेला नसता, तर १५ हजार गोळ्या त्याने वाटप केल्या असत्या आणि अनर्थ घडला असता. याप्रकरणी पोलिस दहशतवाद या अँगलनेदेखील तपास करत आहेत. दरम्यान, ही गोळी खाल्ल्याने सलमान सय्यद याची प्रकृती बिघडली होती. त्याच्यावर उपचार केल्यानंतर आता प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.