

मुंबई : राज्य सरकारने हरवलेल्या महिलांना शोधण्यासाठी विशेष विभाग तयार केला आहे. या विभागाच्या कामगिरीमुळे गेल्या वर्षभरात सापडलेल्या महिलांची संख्या 10 टक्क्यांनी वाढली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. भाजपा सदस्य निरंजन डावखरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, या विशेष विभागाच्या माध्यमातून महिला अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली नियमित बैठकांचे आयोजन करून प्रगतीचे परीक्षण केले जाते. तसेच हरवलेल्या महिलांच्या शोधासाठी राज्यभरात मोहिमा हाती घेतल्या जात आहेत. पहिल्या वर्षभरात साधारण 55 ते 60 टक्के महिलांचा शोध लागतो, तर अडीच ते तीन वर्षांच्या कालावधीत हा आकडा 90 टक्क्यांपर्यंत पोहोचतो. सरकारचे उद्दिष्ट 95-96 टक्क्यांपर्यंत पोहोचणे आहे आणि तोपर्यंत काम थांबवले जाणार नाही. दरवर्षी नवीन ऑपरेशन्स राबवून हरवलेल्या महिलांच्या शोधात सुधारणा करण्यावर शासन भर देत आहे.
अधिक माहिती देताना गृह राज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले, हरविलेल्या मुला- मुलींच्या शोधासाठी राज्यात जुलै 2015 ते डिसेंबर 2024 अखेर 13 ऑपरेशन मुस्कान राबविण्यात आली असून त्यामध्ये 41 हजार 193 लहान मुले, मुली यांचा शोध घेण्यात आला आहे.
सध्या 20 जानेवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान ऑपरेशन मुस्कान 14 मोहिम सुरू असून 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत 454 मुले व 947 मुली अशी एकूण 1401 बालके शोधण्यात आलेली आहेत. हरविलेल्या महिला व बालकांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन शोध ही विशेष मोहिम राबविण्यात आली आहे. राज्यात महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
महिला व मुली यावरील अत्याचारास प्रतिबंध करण्याकरीता पोलीसांची गस्त वाढविणे, पोलीस काका, पोलीस दीदी या उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्यात सर्व पोलीस ठाणे स्तरावर महिला मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.