

मुंबई/ठाणे : म्हाडाने ठाण्यात तब्बल ८ हजार घरांसाठी लॉटरी काढण्याचा निर्णय घेतला आहे. चालू ऑक्टोबर महिन्यात या सोडत प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे या सोडत प्रक्रियेच्या माध्यमातून अवघ्या २० लाखांत घर उपलब्ध होणार आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून राबवल्या जाणाऱ्या एकूण २०३० घरांच्या सोडतीची चांगलीच चर्चा रंगली आहे. पुढच्या काही दिवसांत या सोडत प्रक्रियेत कोणाला घरे मिळाली आणि कोणाला नाही, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, मुंबई मंडळाकडून ही सोडत प्रक्रिया राबवली जात असतानाच ठाण्यातील घरांची घोषणा म्हाडाने केली आहे.
मुंबई आणि उपनगरांत राहणारा प्रत्येकजण आपल्या हक्काच्या घरात जाण्याचं स्वप्न पाहात असतो. माझेही स्वतःचे घर होईल, अशी आशा प्रत्येक जण बाळगून असतो. म्हाडामुळे आता स्वतःच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या अनेकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण म्हाडाच्या कोकण मंडळाकडून एकूण ८००० घरांची लॉटरी काढली जाणार आहे. ही लॉटरी ऑक्टोबर महिन्यात येणार आहे. येत्या ८ ऑक्टोबर रोजी लॉटरी काढली जाईल. या घरांमध्ये वसई, टिटवाळा, ठाणे येतील म्हाडाच्या घरांचा समावेश असेल. विशेष म्हणजे ही घरे अवघ्या २० लाख रुपयांत मिळणार आहेत.
दुसरीकडे सिडकोतर्फेदेखील घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहेत. सिडकोकडून वाशी, सानपाडा, जुईनगर, खांदेश्वर, नेरूळ या मोक्याच्या ठिकाणी घरे बांधली जात आहेत. या भागात एकूण ६७ हजार घरांचे काम सुरू आहे. यातील ४० हजार घरांचे काम पूर्ण झाले आहे. सिडकोच्या घरांच्या लॉटरीचीही दसऱ्याच्या मुहूर्तावर जाहिरात निघण्याची शक्यता आहे.
मुंबई मंडळाकडून एकूण २०३० घरांसाठी लॉटरी प्रक्रिया राबवण्यात आली. या लॉटरीचा निकाल येत्या ८ ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाईल. म्हणजेच ८ ऑक्टोबर रोजी कोणाला घर मिळाले आणि कोणाला मिळाले नाही? हे स्पष्ट होईल. या सोडत प्रक्रियेदरम्यान म्हाडाच्या घरांची किंमत फारच जास्त आहे, अशी तक्रार नागरिकांकडून केली जात होती. त्यानंतर म्हाडाने २०३० पैकी एकूण ३७० वेगवेगळ्या ठिकाणच्या घरांची किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला होता.