

मुंबई: ऐन लग्नसराईचा हंगाम सुरू असतानाच छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्यातील बँकांमध्ये 500 च्या नोटांचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिक हवालदिल झाले आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी तातडीने या टंचाईकडे रिझर्व्ह बँकेचे लक्ष वेधले.
या तुटवड्यामुळे अनेक बँकांमध्ये ग्राहकांना रोख रक्कम काढताना अडचणी येत आहेत. काही ठिकाणी पैसे वितरणावर मर्यादाही आणण्यात आली आहे. या चिंताजनक परिस्थितीमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती दानवे यांनी केली आहे.
ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या पेरणीपूर्व मशागतीची कामे वेगात सुरू आहेत. बी-बीयाणे आणि खतांच्या खरेदीसाठी रोख व्यवहारांची गरज असताना 500 च्या नोटांचा तुटवडा नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
अंबादास दानवे यांनी ‘एक्स’ या सोशल मीडियावर पोस्ट करत मराठवाड्यातील 500 रुपयांच्या नोटांची टंचाई समोर आणली. 100 किंवा 200 रुपयांच्या नोटा उपलब्ध असल्या तरी मोठे व्यवहार करताना त्यांचे ओझे वाढते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.