

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने रिक्षा, टॅक्सी, ओला, उबर, रॅपिडो, स्कूल बस आदी व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यावहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याअनुषंगाने महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आल्या असून, १६ ऑगस्टपासून या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना ८ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत निवेदनाद्वारे दिली.
मंत्री सरनाईक म्हणाले की, रोजगाराच्या शोधात देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या नागरिकांचे महाराष्ट्राने नेहमीच खुल्या मनाने स्वागत केले आहे. मात्र, राज्यातील जनतेशी संवाद साधण्याइतपत व्यावहारिक मराठीचे ज्ञान असणे ही केवळ कायदेशीर अट नसून सामाजिक बांधिलकीदेखील आहे.
हा निर्णय कोणत्याही भाषेविरोधात नसून कोट्यवधी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी, सुलभ संवादासाठी आणि ग्राहकाभिमुख सार्वजनिक सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने घेण्यात आला आहे.
चालक आणि प्रवासी यांच्यातील स्पष्ट संवादामुळे गैरसमज कमी होतील, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळेल आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल, असेही सरनाईक यांनी सांगितले. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी परिवहन विभागाने मागील काही महिन्यांपासून राज्यव्यापी प्रशिक्षण मोहीम राबविली आहे.
कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग यांच्या सहकार्याने हजारो अनुभवी शिक्षकांची फळी तयार करण्यात आली असल्याची माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली.