

Manoj Jarange Mumbai Protest : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा 'चलो मुंबई'चा नारा दिला आहे. १९ सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनाची तयारी ऑगस्ट महिन्यातच सुरू करण्यात आल्याचे समोर आले आहे. जरांगे यांच्या समर्थकांनी आधी मुंबई पोलिसांकडे रितसर परवानगी मागितली असून, त्यानंतरच आंदोलनाची पुढील आखणी केल्याचे स्पष्ट झाले आहे.
मनोज जरांगे यांच्या समर्थकांनी १८ ऑगस्ट आणि २७ ऑगस्ट रोजी मुंबई पोलिसांना अर्ज सादर केले होते. या अर्जांमधूनच १९ सप्टेंबर रोजी आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनासाठी परवानगी मागण्यात आल्याचा उल्लेख आहे.
आझाद मैदानावरील आंदोलनासाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मंगळवारी मुंबई महापालिकेकडे (BMC) अर्ज दिला जाणार आहे. दरम्यान, जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर उच्च न्यायालयाने निर्णय दिला असून, आंदोलन करणे हा मूलभूत अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता मुंबई पोलीस मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला परवानगी देण्याबाबत काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
१५ सप्टेंबर : अंतरवली येथून मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघणार व पहिला मुक्काम हा बीड जिल्ह्यातील पाटोद्यात होणार आहे.
१६ सप्टेंबर : १६ तारखेला सकाळी पाटोद्यातून पुढच्या प्रवासासाठी निघणार व दुसरा मुक्काम अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे होणार आहे.
१७ सप्टेंबर : सकाळी श्रीगोंदा येथून पुढील प्रवासासाठी निघणार. तिसरा मुक्काम पुण्यातील हडपसर येथे होणार आहे. १७ रोजी मुक्काम होईल.
१८ सप्टेंबर : हडपसर येथून सकाळी रायगड जिल्ह्यातील खोपोली किंवा कोपरखैरणे येथे होईल (सध्या खोपोली फायनल). १८ च्या रात्री मुक्काम व पुढे.
१९ सप्टेंबर :खोपोली येथील मुक्कामानंतर आझाद मैदान येथे जाऊन सकाळी १० वाजेपासून बेमुदत उपोषण सुरू होणार.