

मुंबई : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या शनिवारी झालेल्या निवडणुकांसाठी सरासरी 66 टक्के मतदान झाले. मतदानानंतर उमेदवार निर्धास्त झाले असले तरी, आता त्यांचे लक्ष सोमवारी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे. निवडणुका पार पडलेल्यांत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांचा समावेश आहे.
जिल्हा परिषदेच्या 731, तर पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी झेडपी, पंचायत समित्यांसाठी राज्यात 66% मतदान ही निवडणूक झाली. एकूण 7 हजार 438 उमेदवारांचे नशीब मतदान यंत्रात ‘लॉक’ झाले. या निवडणुकीसाठी एकूण 2 कोटी 8 लाख 20 हजार 702 मतदार पात्र होते. त्यापैकी केवळ 66 टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला.
जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत 2 हजार 624 जण स्पर्धक होते. 12 जिल्हा परिषदांच्या 731 जागांसाठी ही निवडणूक झाली. 125 पंचायत समित्यांमधील 1 हजार 462 जागांसाठी मतदान झाले. त्यामध्ये 4 हजार 814 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.
दिवसभरात मतदारांचा उत्साह
सकाळी 7.30 पासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळी 9.30 पर्यंत 7.80 टक्के मतदान झाले. सकाळी 11.30 पर्यंत 22.26 , दुपारी 1.30 पर्यंत 37.94, दुपारी 3.30 पर्यंत 52.02 तर 5.30 ते मतदान संपेपर्यंत सरासरी 66 टक्के मतदान झाले.
मतदारांचा गोंधळ
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदारांनी एक मत दिले होते. मात्र, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी एकत्र मतदान झाले. जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी मतदान यंत्रावर पांढऱ्या रंगाची तर पंचायत समितीसाठी गुलाबी रंगाची मतपत्रिका होती. त्यामुळे मतदान करताना ज्येष्ठ नागरिक मतदारांचा अनेक ठिकाणी गोंधळ उडाला होता.