

मुंबई : राज्यातील वाहनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट म्हणजेच ‘एचएसआरपी’ (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) बसविण्याची अंतिम मुदत मंगळवारी (३० जून) संपली आहे. त्यामुळे बुधवारपासून (१ जुलै) ही नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर थेट दंडात्मक कारवाईची कुऱ्हाड कोसळणार आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ अन्वये पोलिस आणि परिवहन विभाग संयुक्तपणे ही मोहीम राबवणार आहेत. ज्या वाहनधारकांनी आजपर्यंत केवळ अपॉईंटमेंट घेतली आहे, त्यांना दंडात्मक कारवाईतून तात्पुरता दिलासा मिळेल. मात्र, ज्यांनी अद्याप नोंदणीच केलेली नाही, त्यांना मोठा दंड भरावा लागू शकतो.
राज्यातील सर्व वाहनांना बुधवार, १ जुलैपासून ‘एचएसआरपी’ बंधनकारक असेल. याआधी पाच वेळा मुदतवाढ दिली असून पुन्हा मुदतवाढ मिळणार नाही. आता ठोस कारवाई केली जाणार, असे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.
आरटीओ सेवांवर येणार गदा
‘एचएसआरपी’ नंबरप्लेट न बसविणाऱ्या वाहनांची आरटीओमधील पुढील महत्त्वाची कामे रोखली जाऊ शकतात. त्यामध्ये वाहनाचे हस्तांतरण (ट्रान्सफर ऑफ ओनरशिप) आणि पत्ता बदलणे, वाहनावरील कर्जबोजा चढविणे किंवा उतरविणे, वाहनाची पुनर्नोंदणी (रि-रजिस्ट्रेशन) आणि वाहनातील बदल, परवाना नूतनीकरण (परमिट रिन्युअल) या कामांचा समावेश आहे. फिटनेस प्रमाणपत्राच्या नूतनीकरणाला यातून वगळण्यात आले आहे.