

मुंबई : इस्रायल-अमेरिका विरुद्ध इराण युद्धामुळे राज्यात स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. बुकिंग करूनही गॅस मिळत नसल्यामुळे नागरिकांच्या गॅस एजन्सीजपुढे लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे सरकारने एका परिपत्रकाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना प्राधान्यक्रम क्षेत्र व त्यांना गरजेनुसार किती गॅसपुरवठा करायचा, यासंबंधीचे दिशानिर्देश जारी केलेत. यात काही क्षेत्रांना 100 टक्के, तर काही क्षेत्रांना 70 ते 50 टक्के गॅसपुरवठा करण्याची सूचना करण्यात आली आहे.
सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत राज्य सरकारने स्वयंपाकाच्या गॅसच्या पुरवठ्याला प्राधान्य दिले आहे. याप्रकरणी व्यावसायिक गॅसच्या पुरवठ्यावर अंशतः निर्बंध लादण्यात आलेत. परिणामी, गॅसवर अवलंबून असणाऱ्या राज्यातील उद्योग, व्यवसायांना जबर फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एका परिपत्रकाद्वारे गॅस वितरणाविषयी एक नियमावली जारी केली आहे. त्यानुसार, रुग्णालये, शैक्षणिक संस्था व सार्वजनिक सेवांना 100 टक्के गॅसपुरवठा करण्याचे आदेश देण्यात आलेत. तर, इतर संस्था व विभागांना 70 ते 50 टक्के गॅसपुरवठा करण्याचे आदेश सरकारने दिलेत.
राज्याचे सहसचिव अशोक आत्राम यांनी या परिपत्रकाद्वारे राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना उद्देशून म्हटले आहे की, आपल्या जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, वसतिगृहे, शासकीय खानावळ, माध्यान्ह भोजन योजना, अंगणवाडी, शैक्षणिक संस्थांतर्गत चालवण्यात येणाऱ्या खानावळी इत्यादींना एलपीजी सिलिंडरच्या 100 टक्के वाटपाबाबतची कार्यवाही करण्यात यावी आणि त्याबाबतचा अहवाल शासनास दररोज सादर करण्यात यावा.