

मुंबई: महाराष्ट्र राज्य शासनाने केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर राज्यातील महाराष्ट्र राज्य संर्वगातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. शासनाने आयएएस, आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 2 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी कर्मचाऱ्यांना 58 टक्के महागाई भत्ता मिळत होता. आता तो येथून पुढे 60 टक्के इतका होईल.
सामान्य प्रशासन विभागाने आज, ११ मे २०२६ रोजी यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय (जीआर) काढला आहे. ही वाढ १ जानेवारी २०२६ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य संवर्गातील आयएएस (IAS), आयपीएस (IPS) आणि आयएफएस (IFS) यांसारख्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाने २२ एप्रिल २०२६ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार राज्य शासनाने हे आदेश लागू केले आहेत.