

मुंबई : रायगड, राजगड आणि पन्हाळ्यासह 12 शिवकालीन गड-किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश व्हावा, यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भातील तांत्रिक आणि राजनैयिक सादरीकरणासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखालील चारजणांचे शिष्टमंडळ फ्रान्सची राजधानी पॅरिसच्या दौर्यावर रवाना झाले आहे.
राज्य सरकारने ‘मराठा लष्करी भूप्रदेश’ या संकल्पनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यासाठीचा प्रस्ताव सादर केला आहे. या किल्ल्यांमध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी किल्ला आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला यांचा समावेश आहे. याबाबतचे सादरीकरण पूर्ण क्षमतेने प्रभावीपणे करण्यासाठी मंत्री शेलारांसह अप्पर मुख्य सचिव विकास खारगे, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे उपसंचालक हेमंत दळवी आणि वास्तुविशारद शीखा जैन यांचे शिष्टमंडळ पॅरिसला रवाना झाले आहे. शिवकालीन 12 किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळविण्यासाठी पॅरिस येथे 22 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत शिष्टमंडळाकडून आवश्यक तांत्रिक आणि राजनैतिक सादरीकरण करण्यात येणार आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाल्यास या किल्ल्यांचे जतन, संवर्धन आणि पर्यटन विकासासाठी अधिक संधी उपलब्ध होतील. ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि सांस्कृतिक वारशाचे जतन सुनिश्चित होईल.