

मुंबई : महाराष्ट्र दिनापासून राज्यातील जनगणना सुरू होत असून या पहिल्या टप्प्यात पहिल्या टप्प्यात 1 मे ते 15 मे ‘स्वगणना’ होईल. त्यानंतर 16 मे ते 14 जून या दुसऱ्या टप्प्यात कर्मचाऱ्यांकडून घरोघरी जावून घरयादी आणि घरगणना केली जाईल.
घरगणना करण्यासाठी राज्यात 2 लाख 64 हजार प्रगणक व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी 141 मास्टर प्रशिक्षकांना पुण्यात यशदामध्ये प्रशिक्षण देण्यात आले आहे.
देशाची ही आठवी जनगणना असून प्रथमच डिजिटल जनगणना होत आहे. शिवाय प्रथमच नागरिकांना ‘स्वगणने’चा पर्याय देण्यात आला आहे. आपल्या मोबाईलद्वारे जनगणनेसाठी आवश्यक माहिती भरता येईल. नागरिकांनी या स्वगणनेत सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याच्या मुख्य जनगणना अधिकारी निरुपमा डांगे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केले. यावेळी जनगणना संचालनचे उपमहानिबंधक ए. एन. राजीव, यशवंत पाटील आणि उपसंचालक संतोष पायस उपस्थित होते.
या जनगणनेत प्रथमच घराघरांतील अन्नधान्य सेवनाचीही माहिती गोळा केली जाणार आहे. भरडधान्याचा वापर वाढविण्याच्या उद्देशाने ही माहिती गोळा केली जाणार असल्याची चर्चा आहे.
स्वतःची माहिती स्वतः भरण्यासाठीचे स्वतंत्र पोर्टल 1 मे ते 15 मे सुरू राहिल. https ://se.census.gov.in या पोर्टलवर आणि मोबाईल ॲपच्या माध्यमातून स्व जनगणना करता येईल.
घरातील कोणताही एक सदस्य सुमारे 15 ते 20 मिनिटांत स्वयंगणना करू शकतो.
या स्वगणनेत 16 भाषांत एकूण 33 प्रश्न आहेत. घराची स्थिती, कुटुंब प्रमुखासह इतरांची नावे, पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत, प्रकाशाचा मुख्य स्रोत, कुटुंबातील विवाहित जोडप्यांची संख्या, कुटुंबप्रमुख अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीपैकी आहे का? असे प्रश्न असतील. स्वगणना पूर्ण केल्यानंतर एसई क्रमांक मिळेल.
जातनिहाय नोंदही केली जाणार
यंदा पहिल्यादांच जनगणेत जातनिहाय नोंद केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात घरनोंदणी होईल. त्यानंतरचा प्रत्यक्ष जननोंदणीचा टप्पा पुढील वर्षी सुरू होईल. यामध्ये जातनिहाय जनगणना प्रस्तावित असून त्याची सविस्तर अधिसूचना केंद्र सरकारकडून पहिल्या टप्प्यानंतर जारी केली जाणार आहे.