

Vantara On Madhuri Elephant Satellite Rehabilitation Centre Proposal
मुंबई : माधुरी (महादेवी) हत्तिणीला कोल्हापुरात परत आणावं, यासाठी कोल्हापूरकर आक्रमक झाले असतानाच वनताराने माधुरीच्या घरवापसीसाठी कंबर कसली आहे. माधुरीच्या स्थलांतरामुळे व्यथित झालेल्या जैन मठ आणि कोल्हापूरच्या जनतेच्या भावनांची दखल घेत, 'वनतारा' संस्थेने तिच्या पुनर्वसनासाठी एक महत्त्वपूर्ण प्रस्ताव सादर केला आहे. माधुरीसाठी नांदणी परिसरातच आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुनर्वसन केंद्र उभारण्याची तयारी वनताराने दर्शवली आहे.
गेल्या काही दिवसांपासून माधुरी हत्तिणीच्या स्थलांतराचा मुद्दा कोल्हापूरात चर्चेचा विषय ठरला आहे. माधुरी हत्तिणीला परत कोल्हापुरात नेण्यासंदर्भात वनताराने सरकारकडे प्रस्तावदेखील सादर केला आहे. महाराष्ट्र सरकार आणि नांदणी मठाने माधुरीला परत आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेला पाठिंबा देण्याचे आश्वासन वनताराने दिले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे नांदणी परिसरातच माधुरीसाठी एक अत्याधुनिक ' पुनर्वसन केंद्र' (Satellite Rehabilitation Centre) उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे.
माधुरीसाठीच्या प्रस्तावित केंद्रामध्ये कोणत्या सुविधा उपलब्ध असतील?
हायड्रोथेरपी तलाव: सांधे आणि स्नायूंच्या उपचारांसाठी.
पोहण्यासाठी स्वतंत्र तळे: नैसर्गिक हालचालींना प्रोत्साहन देण्यासाठी.
लेजर थेरपी आणि उपचार कक्ष: शारीरिक पुनर्वसनासाठी.
साखळीमुक्त हिरवीगार जागा: मोकळेपणाने फिरण्यासाठी.
ऑन-साइट पशुवैद्यकीय दवाखाना: २४ तास वैद्यकीय देखरेखीसाठी.
मऊ वाळूचे ढिगारे आणि रबराइज्ड फ्लोअरिंग: संधिवाताचा त्रास कमी करण्यासाठी आणि आरामदायी विश्रांतीसाठी.
हे केंद्र उच्चाधिकार समितीच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आणि आंतरराष्ट्रीय मानकांनुसार विकसित केले जाईल. यासाठीची जागा मठ आणि राज्य शासनाशी चर्चा करून निश्चित केली जाईल, असेही वनताराने स्पष्ट केले आहे.
प्रस्ताव केवळ शिफारस, निर्णय अंतिम नाही
वनताराने हा प्रस्ताव केवळ माधुरीच्या हितासाठी आणि न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करणे सोपे व्हावे यासाठी दिल्याचे प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. "ही केवळ एक शिफारस आहे, बंधनकारक अट नाही. जैन मठ यावर कोणताही पर्यायी प्रस्ताव मांडू इच्छित असल्यास, आम्ही त्याचे स्वागत आणि आदर करतो," असंही वनताराने स्पष्ट केले.
माधुरीसंदर्भात फक्त न्यायालयाच्या आदेशाचे पालन, वनताराने पुढाकार घेतला नव्हता
वनताराने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, माधुरीचे स्थलांतर हे माननीय सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार झाले होते, यात वनताराने स्वतःहून कोणताही पुढाकार घेतला नव्हता, असे संस्थेने स्पष्ट केले आहे. "एक बचाव आणि पुनर्वसन केंद्र म्हणून आमची भूमिका केवळ न्यायालयाच्या आदेशानुसार माधुरीची देखभाल करणे, तिला वैद्यकीय सेवा पुरवणे आणि तिच्या निवासाची व्यवस्था करणे इतकीच मर्यादित होती. आम्ही तिच्या स्थलांतराची शिफारस केली नाही किंवा धार्मिक भावनांमध्ये हस्तक्षेप करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता," असे वनताराने म्हटले आहे.
या संपूर्ण प्रक्रियेमुळे जैन समुदायाच्या आणि कोल्हापूरच्या लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर त्याबद्दल संस्थेने माफीदेखील मागितली आहे.