

Kunbi Samaj Protest Azad Maidan Mumbai
मुंबई/खांब : विविध मागण्यांसाठी कुणबी समाजोन्नती संघ मुंबईतर्फे कोकणातील मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यात ओबीसी आरक्षण बचाव तसेच ते अबाधित ठेवण्यासाठी 9 ऑक्टोबर रोजी कुणबी बांधवांचा संघ अध्यक्ष अनिल नवगने यांच्या अध्यक्षतेखाली आझाद मैदानावर मोर्चा आंदोलन काढण्यात आला. आमच्या आरक्षणात मराठा समाजाला घुसवलं जात आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या दबावाखाली काढलेला जीआर रद्द करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
यासाठी हजारोंच्या संख्येने कुणबी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मुंबई संघाचे अध्यक्ष अनिल नवगणे तसेच उपाध्यक्ष शंकरराव म्हसकर यांनी सात जिल्ह्यातील कुणबी बांधवांना केले होते. यापार्श्वभूमीवर गुरुवारी कुणबी आंदोलक मोठ्या संख्येने आझाद मैदानात जमले होते. 'आमची सरकारकडे फार मोठी मागणी नाही. मराठा समाजाला कुणबी आरक्षणात घुसवले जात आहे. सरकारने हैदराबाद गॅझेटियरबाबत काढलेला अध्यादेश तातडीने मागे घ्यावा. आम्ही शांततेत मागणी करत आहोत. पण सरकारने वेळीच निर्णय घेतला नाही तर समाज आक्रमक होईल, असा इशाराच या आंदोलकांनी सरकारला दिला.
जन्माने आणि कर्माने कुणबी असलेल्या कुणबी समाजाच्या वतीने सरकारकडून होत असलेल्या अन्याय विरोधात आझाद मैदानावर हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनासाठी बुधवारपासूनच प्रमुख पदाधिकारी यांच्या गाड्यांचे ताफे आझाद मैदानाकडे जय्यत तयारीसाठी निघाले होते. कायदा आणि सुव्यवस्थेच्या सूचना देखील आंदोलनात सहभागी होणार्या प्रत्येक समाज बांधव यांना सात जिल्ह्यातील तालुका स्थरावर तसेच प्रत्येक विभाग ग्रुपमध्ये बैठका घेऊन देण्यात आल्या होत्या.
अधिक अधिक कुणबी समाज बांधवांनी आपल्या हक्कासाठी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन वरिष्ठांच्या आदेशानुसार स्थानिक ग्रुप अध्यक्ष यांच्याकडून आयोजित बैठकीतून करण्यात आली होती. रायगडमध्ये तालुका स्थरावरील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी जोरदार तयारी केली होती.
संघर्षासाठी कुणबी समाजाच्या वतीने एकजुटीचा निर्धार करण्यात आला असून आज आझाद मैदानावर होत असलेले आंदोलन हे ना भूतो ना भविष्य असे ठरले आहे. मराठा समाजाला शासनाने दिलेले आरक्षणास कुणबी समाजासह ओबीसींचा तीव्र विरोध आहे. आणि सरकारने त्वरित तो जीआर रद्द करावा, अशी प्रमुख मागणीसाठीआझाद मैदानावर हा मोर्चा काढण्यात आला.
अनिल नवगणे, अध्यक्ष , कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई
ओबीसी विद्यार्थाना 100 टक्के शिष्यवृत्ती मिळालीच पाहिजे. जातिनिहाय जनगणना झालीच पाहिजे. शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळास स्वतंत्र दर्जा देवून त्यास पंधराशे कोटी रुपयांची भरीव आर्थिक तरतूद शासनाने लवकरात लवकर करावी, लोकनेते शामराव पेजे न्यासासाठी सरकारने 50 कोटीचा निधी उपलब्ध करून द्यावा, आदी मागण्यांसह जन्माने आणि कर्माने कुणबी असून ते आर्थिक दृष्ट्या मागास आहेत. जातीचा दाखला शासनाच्या काही जाचक अटीशर्तीमुळे मिळत नसल्याने मुलाबाळांचे मोठा नुकसान होत असल्याने हा जनआक्रोष मोर्चा सरकारला जागे आणण्यासाठी आझाद मैदानावर काढण्यात आला.
शंकरराव म्हसकर, उपाध्यक्ष