

मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त कोकण गोवा व दक्षिण भारतात विशेष गाड्या चालवण्यात येत असल्यामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडून गेले आहे. त्यामुळे सर्वच गाड्यांची रखडपट्टी होत असून याचा सर्वाधिक त्रास नियमित गाड्यांपेक्षा विशेष गाड्यांनी प्रवास करणाऱ्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकणवासिय मुंबईकरांना होत आहे.
उन्हाळ्यात कोकणात जाणाऱ्या मुंबईकरांची संख्या मोठी असल्यामुळे कोकण रेल्वेसह मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वेने नियमित गाड्यांसह विशेष गाड्या सोडल्या आहेत. त्यामुळे एकावेळी रोहा ते मडगाव कोकण रेल्वे मार्गावर ये-जा करणाऱ्या किमान 30 ते 35 गाड्या असतात.
रोहा ते मडगावपर्यंत रेल्वे स्टेशन वगळता एकच येण्या जाण्यासाठी एकच मार्ग आहे. त्यामुळे क्रॉसिंगला गाड्या किमान 15 ते 20 मिनिट उभ्या केल्या जातात. काही वेळा तर अर्धा-अर्धा तास गाडीला उभे केले जाते. त्यामुळे स्टेशनवर पोहचण्याचा वेळ व गाडी येण्याचा वेळ यामध्ये एक ते दीड तास काही वेळा दोन ते तीन तासांचा कालावधी असतो.
त्यामुळे कोकणवासीयांनी प्रचंड रखडपट्टी होत आहे. रेल्वे स्टेशनवर पुरेशी सेवा-सुविधा नसल्यामुळे एकाच ठिकाणी गर्दी करून बसावे लागत आहे. काही ठराविक नाश्ता सोडला, तर बाकी अन्य जेवणाची कोणतीही सुविधा नसल्यामुळे प्रवाशांना उपाशीपोटी ताटकळत बसावे लागत आहे.
मडगाव येथून वांद्रे टर्मिनसपर्यंत सुपरफास्ट गाडी चालवण्यात येते. या गाडीला मडगाव सुटल्यानंतर करमाळी, थिवीम, सावंतवाडी, सिंधुदुर्ग, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, वीर, रोहा व पनवेल व पुढे भिवंडी वसई असे थांबे देण्यात आले आहेत. मात्र ही गाडी मडगाव वरून वेळेवर सुटूनही प्रत्येक स्टेशनवर क्रॉसिंगसाठी थांबवली जाते. त्यामुळे गाडीचे वेळापत्रकच कोलमडून गेले आहे. त्यामुळे या गाडीने प्रवास करणे नकोसे झाले आहे.
केवळ कोकणकन्या व मांडवी वगळता अन्य कोणत्याही गाड्या वेळापत्रकानुसार सुरू नाहीत. वंदे भारत, तेजस, जनशताब्दी या सुपरफास्ट गाड्यांसाठी विशेष गाड्यांना अक्षरशः बाजूला काढले जात आहे.
विशेष गाड्यांमध्ये सकस आहार द्या!
विशेष गाड्यांमध्ये पॅन्ट्री नसल्यामुळे कोकणकन्या व मांडवीप्रमाणे प्रवाशांना सकस आहार मिळत नाही. त्यामुळे गाडीमध्ये जे काही पदार्थ येतात तेच खावे लागत आहेत. गाड्यांची रखडपट्टी झाल्यानंतर जेवण नसल्यामुळे अनेकदा प्रवाशांना वडापाव, समोसा, भेळ खाऊन राहावे लागत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने सकस आहार पुरवण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
त्यापेक्षा पॅसेंजर सुरू करा!
सुपरफास्ट व एक्सप्रेस गाड्या चालवून त्या प्रत्येक स्टेशनला थांबणार असतील, तर रेल्वे प्रशासनाने पॅसेंजर गाड्या सुरू कराव्यात. जेणेकरून या गाड्या प्रत्येक स्टेशनवर थांबल्यामुळे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच गावांतील नागरिकांना त्याचा फायदा होईल, असे मत वैभववाडी तालुका रेल्वे प्रवासी मित्र या संघटनेचे सदस्य मोहन रावराणे यांनी व्यक्त केले आहे.