

मुंबई : कोल्हापूर ते रत्नागिरी या दोन महत्त्वाच्या केंद्रांना आता भुयारी महामार्गाने जोडले जाणार आहे. दरम्यान, रत्नागिरी-कोल्हापूर मार्गाचे आंबा घाटातून सिंगल लाईन मार्गाचे काम झाले आहे. त्यामुळे भुयारी मार्गाने आंबा घाट कोल्हापूरला जोडण्यात येईल. परिणामी कोल्हापूर-रत्नागिरी प्रवास अडथळ्याविना वेगवान होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना नागपूर येथे त्यांच्या निवासस्थानी शनिवारी ही माहिती दिली.
हा मार्ग आंबा घाटातून जाईल. महाराष्ट्रात दोन महत्त्वाची शहरे जोडण्याचा हा कार्यक्रम पथदर्शी ठरणार आहे. सामंत यांनी शनिवारी केंद्रीय मंत्री गडकरी यांची नागपूर येथील निवासस्थानी भेट घेऊन कोकणातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. मुंबई ते गोवा महामार्गावरील प्रलंबित कामांची या भेटीदरम्यान चर्चा करण्यात आली. मुंबई-गोवा महामार्गावरील टोल कमी करण्यासाठी कशी पावले उचलता येतील यावर लवकरच अधिकारी गटाची बैठक घेण्यात येणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील निवळी ते जयगड रस्ता, जयगड ते गुहागर रस्ता, चिपळूण ते सातारा रस्ता बांधणी यावर रेखांकने मागवली जाणार आहेत.हे रस्ते भविष्यात या भागातील विकासाला चालना देतील. लांजा, राजापूर, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी, खेड, दापोली, मंडणगड मतदारसंघातील विकासात्मक कामांना निधी उपलब्ध करून द्या, अशी मागणीही सामंत यांनी यावेळी केली.