ठाणे : संजय शिरसाट यांचे गद्दार नेते शिंदे हे दिघे साहेबांच्या (Anand Dighe) मृत्यू वेळी अगदी शेवटच्या क्षणी हजर होते असे धर्मवीर १ (Dharmaveer 1) चित्रपटात दाखवले आहे. तेच दिघे साहेबांना खांद्यावरून नेताना दाखवले आहे. मग संजय शिरसाट यांचा रोख नेमका कुणाकडे आहे ? असा प्रति हल्ला करणारा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख व आनंद दिघे (Anand Dighe) यांचे पुतणे केदार दिघे यांनी केला आहे.
दिघे (Anand Dighe) यांच्या हत्येचे पुरावे द्या, की मृत्यूच्या चौकशीसाठी न्यायालयात जाण्यास तयार असल्याचे आव्हान देत केदार दिघे म्हणाले, निवडणुकीत फायदा उपटण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत वारंवार संशय निर्माण करणारे शिंदे गटाचे नेते नीच राजकारण करत आहेत. गेली बावीस वर्षे सत्तेची सर्व पदे उपभोगताना यांना आपल्या गुरूच्या मृत्यूबद्दल कोणतीही शंका आली नाही. त्यावेळेला सत्तेचा मलिदा हे लाटत होते आणि आता लोकांमध्ये यांच्या गद्दारीबद्दल प्रचंड नाराजी असल्याने स्वतःला हिरो दाखवण्यासाठी शिंदे गटाचे लोक घाणेरड्या पातळीवर उतरले आहेत.
दिघे (Anand Dighe) साहेबांचा मृत्यू झाला तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात होते. म्हणजे एकीकडे बाळासाहेबांना दैवत मानायचं आणि दुसरीकडे दिघे साहेबांच्या मृत्यूबाबत संशय निर्माण करायचा इतके गलिच्छ राजकारण स्वतःला शिवसैनिक म्हणवणारे हे घाणेरडे लोक करत आहेत, असा हल्लाही केदार दिघे यांनी चढवला. आगामी निवडणुकीत शिंदे गटाचा धुरळा उडणार असल्याने शिंदे गटाचे नेते आणि पदाधिकारी तोंडाला येईल ते बोलू लागले असल्याचे केदार दिघे म्हणाले. मंत्रिमंडळात शिरसाट यांना मंत्री न केले गेल्याने व महामंडळाचे अध्यक्ष पद देऊन बोळवण केल्याने ते त्यांचा संताप व्यक्त करत आहेत का? असाही हल्लाबोल केदार दिघे यांनी केला आहे.