

मुंबई: सरकारी नोकरीच्या आमिषाने तेराजणांच्या एका टोळीने दहाजणांना सुमारे दीड कोटींचा गंडा घातल्याचा प्रकार कांदिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सतीश वानखेडे, शरद दत्तात्रय राजगुरु, बाळासाहेब धोंडीबा कांबळे, डॉ. मंगेश बाबूराव पाटील, धवल मंगेश पाटील, प्रमोद सोलापुरे, विनोद उर्खाडा माळी, रविंद्र गोविंद कांबळे, जितेंद्र युवराज चौधरी, अभय अशोक पाटील, कमलेश गांधलिकर, दिनेश निकाळे आणि यतीन मोरे या तेराजणांविरुद्ध बोगस नोकरीचे नियुक्तीपत्र देऊन पैशांचा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी चारकोप पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
यातील तक्रारदार कांदिवलीतील चारकोप परिसरात राहतात. ते बांधकाम कॉन्ट्रक्टर असून त्यांचे सी सिव्हिलपर्यंत शिक्षण झाले आहे. 2019 साली त्यांची सतीश वानखेडेशी ओळख झाली होती. यावेळी त्याने काही सरकारी अधिकाऱ्यांशी आपले चांगले संबंध असून ते कुठलीही परिक्षा न देता उमेदवारांना थेट सरकारी नोकरी मिळवून देतात, असे सांगितले.
त्यामुळे तक्रारदारांनी सतीशला त्यांच्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली. त्यानेही त्यांना नोकरीचे आश्वासन देऊन त्यांच्याकडून काही रक्कम घेतली. याच दरम्यान त्यांनी त्याच्या परिचितांना ही माहिती सांगून त्यांच्याही सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करण्याची विनंती आरोपीला केली. आरोपीने त्या सर्वांकडून पैसे घेऊन सरकारी नोकरीचे आमिष दाखविले.
मात्र अनेक वर्ष उलटूनही नोकरी न मिळाल्याने तक्रारदारासह इतरांनी चारकोप पोलिसांत तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सतीश वानखेडे याच्यासह शरद राजगुरु, बाळासाहेब कांबळे, डॉ. मंगेश पाटील, धवल पाटील, प्रमोद सोलापुरे, विनोद माळी, रविंद्र कांबळे, जितेंद्र चौधरी, अभय पाटील, कमलेश गांधलिकर, दिनेश निकाळे आणि यतीन मोरे यांच्याविरुद्ध पोलिसांनी बोगस दस्तऐवज बनवून पैशांचा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बोगस नियुक्तीपत्रही दिले
आरोपींनी तक्रारदारासह इतर नऊजणांना विधानभवन, महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य, राज्य उत्पादन शुल्क, आयकर विभाग, टपाल खाते आदी विविध ठिकाणी सरकारी नोकरीचे आमिष दाखविले. त्यांच्याकडून एकूण 1 कोटी 54 लाख 50 हजार रुपये घेतले. मात्र काही वर्ष उलटूनही आरोपींनी त्यांना नोकरी दिली नाही. विचारणा केल्यानंतर त्यांनी त्या सर्वांना नोकरीचे नियुक्तीपत्र दिले. मात्र ते नियुक्तीपत्र बोगस असल्याचे लक्षात येताच त्यांनी आरोपींकडे पैशांची मागणी केली. मात्र कोणालाही पैसे न देता ते सर्वजण पळून गेले.