

मुंबई : सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी ईश्वरपूरच्या नगराध्यक्षांना अपात्र केल्याच्या पार्श्वभूमीवर आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ निवासस्थानी मंगळवारी रात्री भेट घेतली, असे स्पष्ट करत शरद पवार राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आ. जयंत पाटील यांनी आपण महायुतीमध्ये जाणार नाही, अशी भूमिका जाहीर केली.
मुख्यमंत्र्यांच्या या भेटीनंतर जयंत पाटील हे शरद पवार यांची साथ सोडणार, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार, महायुती सरकारमध्ये त्यांना अर्थमंत्रिपद दिले जाणार इत्यादी चर्चा सुरू झाल्या होत्या. आपण पक्ष सोडणार नाही. तसेच, खातेवाटपाचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो, तो अधिकारही प्रसारमाध्यमे हिरावून घेत आहेत. मी कसलाच विचार केलेला नाही, तुम्ही लोकांनीच फार विचार केला आहे. माणूस पक्षातून गेला तरच अशा चर्चांना अर्थ असतो, अशी मिश्किली पाटील यांनी केली. आपल्या मतदारसंघातील ईश्वरपूर नगराध्यक्षांना अतिक्रमण व बेकायदेशीर बांधकामप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवले आहे. हा निर्णय चुकीचा असून यात मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिकरीत्या लक्ष घालावे, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आपण गेलो होतो. यापूर्वी आपण याच कामासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता; पण ते दिल्ली दौऱ्यावर असल्याने भेट होऊ शकली नाही. म्हणून मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, असेही त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.