

मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू झालेला तणाव शिगेला पोहोचला आणि दोन्ही बाजूंनी जोरदार ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले झाले. परंतु भारत-पाकिस्तान युद्धाच्या तणावानंतरही, परदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय शेअर बाजारावरील विश्वास अबाधित राहिला. तर एफपीआय गुंतवणुकीचे आकडे याबाबत साक्ष देत आहेत. मे महिन्यात आतापर्यंत, परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात 14,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे.
हा सलग दुसरा महिना आहे, ज्यात परदेशी गुंतवणूकदार परतले आहेत आणि त्यांनी शेअर बाजारात मोठी गुंतवणूक केली आहे. डिपॉझिटरीच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, एफपीआयने मे महिन्यात आतापर्यंत म्हणजेच 11 दिवसांत 14,167 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे परदेशी गुंतवणूकदारांनी ही गुंतवणूक अशा वेळी केली आहे, जेव्हा भारत आणि पाकिस्तान संघर्ष युद्धाच्या उंबरठ्यावर होता.
2025 च्या पहिल्या 3 महिन्यांनंतर परदेशी गुंतवणूकदारांची भारतीय बाजारात पुन्हा गुंतवणूक दिसून येत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला, एफपीआयने शेअर बाजारात 4,223 कोटी रुपये गुंतवले होते आणि मे महिन्याच्या सुरुवातीलाही हेच दिसून आले. तसेच, 9 मे रोजी या महिन्याच्या आठवड्याच्या शेवटच्या व्यापारी दिवशी 3,798 कोटी रुपयांची विक्री देखील दिसून आली.
भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव असतानाही परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारपेठेत गुंतवणूक का करत होते? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर, पीटीआयच्या अहवालात विश्लेषकांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की अमेरिकन डॉलरचा कमकुवतपणा, अमेरिका आणि चीनच्या अर्थव्यवस्थेतील मंदी, भारताची जलद जीडीपी वाढ आणि घसरणारा महागाई दर आणि धोरण दर यांनी भारतीय बाजारपेठ आकर्षक बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
तत्पूर्वी, वर्षाच्या पहिल्या महिन्यात जानेवारीमध्ये आणि एफपीआयने 78,027 कोटी रुपयांची मोठी विक्री केली होती आणि त्याचा परिणाम शेअर बाजारात घसरणीच्या स्वरूपातही दिसून आला. पुढील महिन्यातही हा ट्रेंड कायम राहिला आणि फेब्रुवारीमध्येही एफपीआयने 34,574 कोटी रुपये काढले. यानंतर, मार्च महिन्यात पैसे काढण्याचा वेग मंदावला आणि परदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीचा आकडा 3,973 कोटी रुपयांवर पोहोचला.