मुंबई : मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेची दखल घेत आगामी सांस्कृतिक धोरणात राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांची उंची किती असावी, याबाबत नियम करण्याबरोबरच शिल्पांची कलात्मकता जोपासण्याची महत्त्वपूर्ण शिफारस तज्ज्ञ समितीने केली आहे. पुढील 15 दिवसांत राज्याचे सांस्कृतिक धोरण जाहीर होणार असून, यासंदर्भात नेमण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे.
राज्याचे सांस्कृतिक धोरण 2010 नंतर प्रथमच जाहीर होणार आहे. धोरण ठरवण्यासाठी कार्याध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांच्या ‘सांस्कृतिक धोरण समिती’ने स्मारकांसाठी सुचविलेल्या शिफारशीमध्ये प्रामुख्याने पुतळ्यांसंदर्भातील निकषांवर प्रकाश टाकला आहे. शासनाकडून परिसराचा विचार करता पुतळ्यांची उंची किती असावी, याबाबत काही नियम ठरवणे आवश्यक आहे. पुतळ्यांच्या कलात्मकतेबाबत निकष ठरविण्यात यावेत.
शिल्पाच्या परीक्षणासाठी शासकीय कलाशिक्षण संस्थेतील शासकीय अधिकारी प्रशिक्षक न ठेवता सोबतच एखाद्या तज्ज्ञाची नेमणूक करावी. पुतळ्याला हार घालण्यासाठी काही ठिकाणी लोखंडी शिड्या उभारण्यात आल्या असून, त्यामुळे सौंदर्याला बाधा येते, असे समितीने म्हटले आहे.
सांस्कृतिक धोरण ठरविताना दहा उपसमित्या नेमण्यात आल्या असून, त्यात कारागिरी, भाषा, साहित्य आणि ग्रंथव्यवहार व वाचनसंस्कृती, द़ृश्यकला, गडकिल्ले आणि पुरातत्त्व, लोककला, संगीत, रंगभूमी, नृत्य, चित्रपट, भक्तिसंस्कृती यांचा समावेश आहे.