

मुंबई : हॉटेलमध्ये पनीरच्या नावाखाली स्वस्त आणि बनावट ‘चीज अॅनालॉग’ खपवून ग्राहकांची होणारी फसवणूक थांबविण्यासाठी नैसर्गिक पनीरऐवजी ‘चीज अॅनालॉग’ वापरल्यास त्याचा स्पष्ट उल्लेख मेन्यू कार्ड किंवा इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्डवर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. महाराष्ट्रात 27 एप्रिलपासून ही मोहीम राबवली जाणार आहे.
अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मोहिमेची केंद्रीय अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरणाने दखल घेतली आहे. 21 एप्रिल रोजी परिपत्रक काढून हा नियम देशभर लागू केला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार्यांची गय केली जाणार नाही. ग्राहकांना आपण नक्की काय खातोय हे जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. पनीरच्या नावाखाली भेसळ करणार्यांना मोकळे सोडणार नाही, असा इशारा झिरवाळ यांनी दिला आहे.
तक्रार कुठे कराल
ग्राहकांनी 1800-222-365 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
1 मे पासून अंमलबजावणी
एक मे 2026 पासून याची अंमलबजावणी केली जाईल. माहिती लपविणार्या हॉटेल चालकांचा परवाना कायमचा रद्द केला जाऊ शकतो.
पनीर आणि चीज अॅनालॉग फरक
अन्नसुरक्षा मानकानुसार पनीर हा केवळ दुधापासून तयार केलेला पदार्थ आहे तर डेअरी अॅनालॉग हे दूधाव्यतिरिक्त खाद्यतेल, स्टार्च, इमल्सिफायर आणि इतर घटक वापरून तयार केले जाते. ते पनीरसारखे दिसत असले तरी ‘चीज अॅनालॉग’ आहे. हॉटेल्स, उपाहारगृहात मोठ्या प्रमाणात चीज अॅनालॉगचा वापर केला जातो. यापुढे त्याची विक्री करताना बिल, इलेक्ट्रॉनिक फलक आणि मेन्यूकार्डवर स्पष्ट उल्लेख बंधनकारक केला आहे.