

मुंबई: विविध आजार आणि व्याधींवरील लस संशोधनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली हाफकिन संस्था मनुष्यबळाच्या तुटवड्यामुळे अडचणीत सापडली आहे. तातडीने रिक्त पदे न भरल्यास येत्या काही वर्षांमध्ये ही संस्था बंद पडण्याची भीती निर्माण झाली आहे.
सध्या संस्थेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा आकडा अतिशय मर्यादित असून, अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. उपलब्ध माहितीनुसार, मुंबई येथे २२० कामगार आणि ६० अधिकारी कार्यरत आहेत, तर पिंपरी येथे १५५ कामगार आणि केवळ १० अधिकारी कार्यरत आहेत. या तोकड्या मनुष्यबळामुळे हाफकिनच्या संशोधनामध्ये मर्यादा आल्या आहेत.
रिक्त पदांचा मोठा बोजा
संस्थेत जवळपास १०० 'चतुर्थ श्रेणी' पदे, १५ 'तृतीय श्रेणी' पदे आणि २० अधिकारी पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे दैनंदिन कामकाज, उत्पादन आणि संशोधन प्रक्रियेवर परिणाम होत आहे. त्यातच आगामी काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर कर्मचारी निवृत्त होणार असल्याने ही परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.
नवीन भरती न झाल्यास अनुभवी मनुष्यबळाचा तुटवडा तीव्र होणार आहे. तातडीने भरती प्रक्रिया राबवून तांत्रिक आणि प्रशासकीय पदे भरली नाहीत, तर २०३२ पर्यंत संस्थेची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात घटण्याचा धोका असल्याचे हाफकिन महामंडळातील संचालक मंडळातील कर्मचारी प्रतिनिधी दीपक पेडणेकर यांनी सांगितले.
मनुष्यबळ स्थिती
मुंबई- २२० कामगार, ६० अधिकारी
पिंपरी - १५५ कामगार, १० अधिकारी
रिक्त पदे
चतुर्थ श्रेणी - १००
तृतीय श्रेणी - १५
अधिकारी- २०