Grocery Price Hike: डाळी, तेल, साखर महागली; किराणा खर्चात २०% वाढ

महागाईचा सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराला मोठा फटका बसला आहे. जून ते ऑगस्टदरम्यान डाळी, धान्य, साखर, शेंगदाणे आणि खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली असून किराणा खर्च २० टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
Grocery Price Hike
Grocery Price HikePudhari
Published on
Updated on

नवी मुंबई: महागाईचा फटका दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असून, याचा सर्वाधिक परिणाम सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरावर होत आहे. इंधन दरवाढ, वाहतूक खर्चातील वाढ, कच्च्या मालाचा वाढलेला खर्च आणि बाजारातील मागणी यामुळे गेल्या तीन महिन्यांत किराणा वस्तूंच्या दरात २० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

जून ते ऑगस्ट या कालावधीत डाळी, धान्ये, साखर, शेंगदाणे आणि खाद्यतेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे प्रत्येक कुटुंबाचा मासिक किराणा खर्च हजारो रुपयांनी वाढल्याचे चित्र आहे.

बाजारातील घाऊक व किरकोळ विक्रेत्यांच्या माहितीनुसार, मसूर डाळ, तूरडाळ, उडीद डाळ, चणा डाळ, मूगडाळ, हरभरा, चवळी, मटकी आणि वाटाणा यांच्या दरात ५ ते २० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. त्याचबरोबर शेंगदाणे, गहू, तांदूळ आणि बाजरीच्या दरातही वाढ झाल्याने दैनंदिन आहार महागला आहे.

साखरेच्या किमतीत वीस रुपयांची वाढ झाल्याने चहा, मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांच्या खर्चातही वाढ झाली आहे.

खाद्यतेलाच्या बाजारातही तेजी कायम असून, सोयाबीन तेल, शेंगदाणा तेल आणि सूर्यफूल तेलाच्या किमतीत १५ ते २० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे घरगुती स्वयंपाकाचा खर्च आणखी वाढला आहे.

नारळाच्या किमतीतही १० ते २५ रुपयांपर्यंत वाढ झाल्याने धार्मिक कार्यक्रम, सण-उत्सव आणि दैनंदिन वापरासाठीही अधिक पैसे मोजावे लागत आहेत. व्यापाऱ्यांच्या मते, इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे मालवाहतुकीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

त्याशिवाय काही भागांत झालेला कमी पाऊस, उत्पादनातील घट, साठेबाजीची शक्यता आणि वाढती मागणी यामुळे अनेक वस्तूंचे दर तेजीत आहेत. घाऊक बाजारातील वाढलेले दर थेट किरकोळ बाजारात पोहोचल्याने ग्राहकांना त्याचा फटका बसत आहे.

महागाईमुळे गृहिणींना घरखर्चाचे नियोजन करताना मोठी कसरत करावी लागत आहे. पूर्वी महिनाभरासाठी मोठ्या प्रमाणात खरेदी करणारी अनेक कुटुंबे आता आवश्यक तेवढ्याच वस्तूंची खरेदी करत आहेत.

काहींनी महाग झालेल्या डाळी आणि खाद्यपदार्थांचा वापर कमी करण्यास सुरुवात केली असून, स्वस्त पर्यायांचा शोध घेतला जात आहे. आगामी काही आठवड्यांत उत्पादन आणि पुरवठा सुरळीत राहिला तर काही वस्तूंच्या किमती स्थिर राहू शकतात.

मात्र इंधन दरात पुन्हा वाढ झाली किंवा पावसाचा परिणाम शेतीवर झाला, तर महागाई आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news