मुंबई : अंधेरीतील गोपाळकृष्ण गोखले पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्याने त्याचे रविवारी, 11 मे रोजी लोकार्पण करण्यात येणार आहे. गोखले पुलाचा भाग 3 जुलै 2018 साली कोसळून दोघांचा मृत्यू झाला होता. यानंतर हा पूल धोकादायक ठरवून पुनर्बांधणीसाठी मुंबई महापालिकेने तो बंद केला होता.
जवळजवळ एक ते दीड वर्ष हा पूल बंद होता. या कालावधीत पुलाचे काम करण्यात आले. यामध्ये रेल्वे हद्दीतील काम, दोन्ही बाजूचे चढ-उतार मार्ग आणि सी. डी. बर्फीवाला पुलास जोडणार्या ‘कनेक्टर’ कामाचा समावेश आहे. तसेच अपघात प्रतिबंधक अडथळा ध्वनिरोधक कठडे, रंगकाम, थर्मोप्लास्ट, कॅट आईज, विद्युत खांब, दिशादर्शक फलक आदी कामे पूर्ण झाल्याने आता त्याचा लोकार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
या पुलाला बर्फिवाला पूलही जोडण्यात आला असून, त्याचाही पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारा मार्ग सुरु झाला आहे. आता पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारा मार्गही सुरु करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. महानगरपालिका प्रशासनाने निश्चित केलेल्या कालमर्यादेत म्हणजेच दिनांक 30 एप्रिल 2025 पर्यंत मुंबईतील पूल व पुलाची इतर सर्व अनुषंगिक कामे पूर्ण होत आहेत.तसेच, विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे बांधकाम 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. पुलाची उर्वरित कामे 31 मे 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे, असे बांगर यांनी सांगितले.