मुंबई : चंदन शिरवाळे
हवामान खात्याचा अंदाज चुकल्यामुळे महाराष्ट्रासह कर्नाटक, केरळ आणि गोव्यातील एकही नौका मासेमारीसाठी जाऊ न शकल्याने महाराष्ट्रात मासळी टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे गटारीनिमित्त सुरमई, पापलेट, बोंबील आणि हलव्याच्या प्रतीक्षेत असलेल्या मत्स्यप्रेमींचा अपेक्षाभंग झाला आहे. मुंबई हे सागरी मासे विक्रीचे प्रमुख आगार आहे. निर्यात योग्य मासे वगळता किनाऱ्यालगतच्या सर्व राज्यांतील मासे मुंबईत विक्रीसाठी आणले जातात. यासाठी महाराष्ट्रातून मासेमारीसाठी कधी परवानगी दिला जाते, याकडे शेजारच्या राज्यांचे लक्ष लागलेले असते. यंदा हवामान खात्याने प्रमुख राज्यांना मत्स्यमारीसाठी १ ऑगस्टचा मुहूर्त दिला होता. तर गुजरातला १५ ऑगस्ट पासून मुभा दिली होती. परंतु, वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे समुद्र खवळला आहे. लाटा उसळत असल्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि गोव्यातील एकही नौका मासेमारीसाठी समुद्रात गेली नाही.
मुंबई शहर आणि उपनगरात ४ हजार ५०० तर राज्यात ९ हजार ३०० नौका आहेत. या सर्व नौका १ ऑगस्टपासून मासेमारीसाठी जाणार होत्या. त्यानुसार सर्व मच्छीमार संस्थांना राज्य सरकारने डिझेल पुरविले होते. परंतु वातावरणातील बदलामुळे मुंबईतील ससून डॉक, भाऊचा धक्का आणि वेसावा बंदराच्या किनाऱ्यावरून एकही नौका समुद्रात जाऊ शकली नाही. मागिल तीन दिवसांपासून येथील नौका किनाऱ्यावर उभ्या आहेत. हीच परिस्थिती शेजारच्या अन्य राज्यांची आहे, अशी माहिती केंद्रीय मत्स्य बोर्डाचे सदस्य रामदास संधे यांनी दिली.
मासेमारीसाठी समुद्रात गेलेली नौका किमान आठवडा ते पंधरवड्यात परत येते. परंतु, यापुढील एक आठवडा तरी मासेमारीसाठी नका समुद्रात जाण्याची शक्यता धुसर झाली आहे . शीतगृहात ठेवलेले मासे काही कारणास्तव निर्यात होऊ शकले नाहीत. त्यामुळे मागील आठवडाभरापासून मुंबईकरांना शीतगृहातील मासे बाजारातून मिळत आहेत. तर हॉटेलवाल्यांचाही मोर्चा अशा प्रकारच्या मासे खरेदीकडे वळला आहे. त्यामुळे गटारीनिमित्त नवीन आणि ताजे मासे खाण्याची इच्छा बाळगलेल्या मत्स्यप्रेमींचा हिरमोड झाला आहे. तर रोजगार बुडत असल्यामुळे मासेमार हवालदिल झाले आहेत, अशी खंतही संधे यांनी व्यक्त केली.
मासळीचे भाव वाढण्यापूर्वी सुरमई ४०० रुपयांना विकली जायची. परंतु ती आता चक्क हजार रुपयाला मिळत आहे. कोळंबीचे भाव ३८० वरुन ६०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. पापलेटची किंमत ८०० ते हजार रुपयांवरुन थेट १३०० रुपयांवर गेले आहेत. बोंबिलची किंमतही २०० ते २५० रुपयांवरुन ७०० रुपयांवर पोहोचली आहे. (तेही मिळाले तरच) पाच नग बांगड्यासाठी २०० रुपये मोजावे लागायचे ते आज ३ नगासाठी २०० रुपये आकारले जात आहेत. वाम ४०० ते ५०० रुपयांवरुन हजार रुपयांवर तर हलवा आणि रावस यांचे दर ३५० ते ४०० रुपयांवरुन ८०० रुपयांवर पोहचले आहेत.
सध्या मुंबईमध्ये मासेमारी बंद आहे. मात्र गुजरात, हावडा बंदर, पोरबंदर येथून मासे मुंबईबरोबर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये दाखल होत आहेत. परंतु हा सर्व आधी साठवून ठेवलेला माल असल्यामुळे सध्या बाजारात मासे महाग आहेत. त्यासोबत ट्रान्सपोर्टेशनदरम्यानही माल खराब होण्याचे प्रमाण बरेच असल्याने आणि पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. याचा फटका मास्यांच्या पुरवठ्यावर बसला आहे.
देशातील पश्चिम व पूर्व किनारपट्टीला पावसाळी मासेमारी बंदी कालावधी दोन महिन्यांचे निश्चित करण्यात आले, असल्यामुळे जून ते ऑगस्ट महिन्या पर्यंत खव्याना ताजे मासे मिळणे दुर्मिळ होऊन जात असते. पूर्व किनारपट्टीवरील भौगोलिक परिस्थिती पश्चिम किनारपट्टी पेक्षा वेगळी असल्याने पूर्व किनारपट्टीवरील पावसाळी मासेमारी दोन महिने बंद ठेवणे योग्य आहे. परंतु पश्चिम किनारपट्टीवरील बदलते हवामान आणि मुसळधार पाऊस वाऱ्यांमुळे पावसाळी मासेमारी बंदी ६१ दिवसांवरून ९० दिवसांवर करण्याची मागणी पारंपारिक मच्छिमार संघटनांकडून होत आहे.
समुद्रात जीवित हानी टाळण्याकरिता आणि मत्स्यसाठ्यात वाढ निर्माण होण्याकरिता ही बंदी कालावधी तीन महिन्यांनी केल्यास वर्षभर मासळी खाव्याना त्याचा आर्थिक फायदा होणार असून पावसाळी बंदी कालावधीत फ्रोजन मासे उपलब्ध राहतात तसेच पूर्व किनारपट्टीवरील पश्चिम बंगाल, ओडिसा आणि आंध्र प्रदेश राज्यातून मोठ्या प्रमाणात मासळी साठा मुंबईत विक्रीला येत असतो. त्यामुळे माश्यांच्या दरांवर हवा तेवढा वाढीचे परिणाम होत नाही तसेच पश्चिम किनारपट्टीवरील तीन महिने बंदी केल्याने मासळी साठ्यात वाढ होऊन संपूर्ण वर्ष मासे खव्यांना कमी दरात मासे विकत घेता येईल कारण मासळी पूरक असल्यामुळे दर सुद्धा स्थिरावले जातील. त्यामुळे शासनाने मच्छिमारांच्या मागणीकडे विचारपूर्वक लक्ष देणे काळाची गरज असल्याचे मत अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र दामोदर तांडेल यांनी व्यक्त केले.