11th admission : अकरावीच्या विशेष अंतिम फेरीत 38 हजार विद्यार्थ्यांना अलॉटमेंट
मुंबई : अकरावी प्रवेशाच्या अंतिम ओपन टू ऑल विशेष फेरीत 38 हजार 853 विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यात आला असून या विद्यार्थ्यांना 2 सप्टेंबर सायंकाळी 6 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घ्यावे लागणार आहे. प्रवेशाची ही अंतिम फेरी असून यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेत प्रवेश पूर्ण करावेत असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
राज्यभर ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेत यावर्षी 9 हजार 535 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मिळून एकूण 21 लाख 59 हजार 232 इतक्या जागा होत्या. त्यापैकी चार नियमित आणि दोन विशेष फेरीत आत्तापर्यंत 14 लाख 79 हजार 654 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली होती त्यापैकी तब्बल 12 लाख 98 हजार 63 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश घेतला आहे.
ही फेरी अंतिम असल्याचे सांगत पसंतीक्रम भरण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले होते. 26 ते 27 ऑगस्ट दरम्यान अर्ज दाखल करण्यासाठी तसेच पसंतीक्रम बदलण्याची संधी विद्यार्थ्यांना दिली होती. या काळात 7 हजार 959 नवीन विद्यार्थ्यांनी नोंदणी केली तर असे मिळून प्रवेश न मिळालेल्या 49 हजार 339 विद्यार्थ्यांचे अर्ज प्रवेशासाठी अंतिम झाले होते, या पैकी 38 हजार 853 विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यात आला आहे.
शाखानिहाय पाहिल्यास कला शाखेसाठी 10 हजार 747, वाणिज्य शाखेसाठी 11 हजार 719 आणि विज्ञान शाखेसाठी 16 हजार 387 असे मिळून विद्यार्थ्यांनी दिलेल्या त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार महाविद्यालयात अलॉटमेंट झाले. त्यापैकी या दिवसाअखेरी 23 हजार 865 विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश घेतला आहे. यामध्ये कॅप फेरीतून 22 हजार 112 तर व्यवस्थापन व अल्पसंख्यांक कोट्यातून 1 हजार 753 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.
प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी 29 ऑगस्ट सकाळी 10 वाजल्यापासून 30 ऑगस्ट सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुदत होती. मात्र, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ही मुदत वाढवून 2 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत करण्यात आली आहे.

