मुंबई : गेल्या काही दिवसात तुमच्या अयोग्य वर्तनामुळे पक्ष अडचणीत येत असून मला ऐकून घ्यावे लागते आहे. स्वत:चे वर्तन बदला, नाहीतर घरी जावे लागेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री व आमदारांना समज दिली. मंत्री संजय शिरसाट आणि आमदार संजय गायकवाड यांचे गैरवर्तन गेल्या आठवडाभर टीकेचा विषय ठरले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी शिंदेंनी प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली होती.
बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावे लागेल हे सांगत कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही असा अप्रत्यक्षरित्या इशाराही त्यांनी दिला. आपल्या परिवारावर कारवाईचा बडगा उगारायला मला अजिबात आवडणार नाही. परंतु, मला कारवाई करायला भाग पडणार नाही असे काम तुमच्याकडून अपेक्षित आहे. मी सगळ्यांशी प्रेमाने वागतो, कुटुंबासारखी वागणूक देतो त्यामुळे तुम्ही वाटेल तसे वागता आहात काय? असा भावनिक सवालही त्यांनी केला असल्याची चर्चा आहे.
गेल्या काही दिवसांत काही गोष्टी घडल्या तुमच्याकडे दाखवलेले बोट खरे तर माझ्याकडे असते असे सांगत त्यांनी माझी अडचण करता आहात असेही सहकार्यांच्या लक्षात आणून दिले. तुमचे आमदार काय करतात? असा प्रश्न मला विचारतात मी तेंव्हा काय सांगायचे असेही ते म्हणाल्याचे मेळाव्याला हजर असलेल्या नेत्यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षाच्या बड्या नेत्यांनी शिंदेंना सवाल केल्याचे वृत्त पुढारीने रविवारी छापले होते.
तुम्ही सगळी माझी माणसे आहात, आपले कुटुंब एक आहे. तुमची बदनामी म्हणजे माझी बदनामी आहे. चुकीच्या गोष्टींवर ताकद वाया घालवू नका. कमी बोला, जास्त काम करा.
मी रागावत नाही. मी प्रमुखासारखे वागत नाही. कार्यकर्त्यासारखं वागतो. तुम्हीही तसेच वागा. कितीही पदे मिळाली तरी कार्यकर्ता आहे असेच समजून कामे करा.
कमी वेळात जास्त यश मिळाले. कारण लोक आपल्या पाठीशी आहेत. त्यामुळे बदनामीचे डाव रचले जात आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची काळजी घ्या.