

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२५-२६ चा केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2025) आज (दि.१) लोकसभेत सादर केला. त्यांनी सलग आठवा विक्रमी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एक्सवर पोस्ट करून प्रतिक्रिया दिली आहे.
शिंदे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचे पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात येणार, याची खात्री देणारा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पात सामान्य नोकरदार वर्गाला जो दिलासा मिळाला आहे. त्याचे वर्णन अभूतपूर्व असंच करावं लागेल. १२ लाखापर्यंतच्या उत्पन्नावर संपूर्ण करमुक्ती मिळाल्याने आता घराघरात लक्ष्मीची पावलं उमटल्याशिवाय राहणार नाहीत. एक सर्वांगसुंदर, आत्मनिर्भर भारताला सबळ करणारा हा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल मी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन करतो, आणि महाराष्ट्रातील तमाम नोकरदारांतर्फे त्यांचे आभारही मानतो.
शिक्षण, आरोग्य आणि कृषी या तिन्ही महत्त्वाच्या क्षेत्रांना अर्थसंकल्पातील कल्पक तरतुदींचा लाभ होणार असल्याने देशाच्या प्रगतीचा आलेख अधिकाधिक उंचावत जाणार यात शंकाच नाही. हा सशक्त भारताचा रोडमॅप आहे. दुरवस्था संपवून पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्त्वात आपला भारत देश सुबत्तेच्या दिशेने वाटचाल करु लागल्याची ही शुभचिन्हे आहेत.