

Double water bill if water meter is off!
मुंबई : पुढारी वृत्तसेवा
महानगरांतील पाण्याचे मोजमाप ठेवणारी खासगी जलमापके बंद असल्यास यापूर्वीच्या सरासरी रकमेवर 100 टक्के अधिक शुल्क आकारले जाणार आहे. तर झोपडपट्टी भागांमध्ये जलमापके बंद राहिल्यास पूर्वीच्या सरासरी बिलाच्या रकमेवर 25 टक्के अतिरिक्त शुक्ल आकारले जाणार आहे. महापालिकेने याबाबत नियमावलीतील पोटनियमांमध्ये बदल करून या सुधारित नियमांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे जलमापके बंद असल्यास त्यांना अंदाजित दुपटीने बिले पाठवली जाणार असल्याची माहिती जल विभागाकडून देण्यात आली.
पिण्यासाठी तसेच वापरासाठी पुरवठा करण्यात येणार्या घरगुती आणि अनिवासी वापराच्या पाण्याची देयके जल आकार नियमावली आणि मलनिःसारण व टाकाऊ पदार्थ निष्कासन नियमावलीतील सुधारित पोट नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या सुधारित पोटनियमांना महापालिकेने मंजुरी दिली आहे. त्यामुळे पाणी वापराचे अचूक मापन करणारी जलमापके सुस्थितीत नसतील तर लवकरात लवकर बदलून घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
सुधारित नियमावलीनुसार आता खासगी जलमापक सहा महिन्यांहून अधिक कालावधीसाठी बंद असल्यास पूर्वीच्या 25 टक्क्यांऐवजी 100 टक्के अधिक वाढ प्रस्ताविण्यात आली आहे. त्यामुळे सरासरी अंदाजित पाण्याची जेवढी रक्कम येणार आहे, त्यावर 100 टक्के अधिक वाढ करून खासगी जलमापक असणार्या ग्राहकाला दुपटीने अंदाजित बिले पाठवली जाणार आहेत.
झोपडपट्टीतील निवासी खासगी जलमापक जर 12 महिन्यांहून अधिक काळ नादुरुस्त असेल, तर त्यांना अंदाजित बिले पाठवली जातात. त्याऐवजी आता सरासरी अंदाजित रक्कम जेवढी येईल त्यावर 100 टक्के अधिक वाढ केली जाणार आहे.
12 महिन्यांपासून अधिक काळ वाचनास उपलब्ध नसेल किंवा जमिनीखाली गाडलेल्या अवस्थेत असेल, तर अंदाजित बिलावर 25 टक्के अधिक वाढ केली जाणार आहे. त्यानुसार आता पाण्याच्या बिलांमध्ये बंद पडलेल्या आणि वाचनासाठी उपलब्ध नसलेल्या जलमापकांसाठी अंदाजित शुल्क आकारताना नवीन नियमावलीचा आधार घेतला जाणार आहे.