

मुंबई : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचे सोमवारी विधानसभेतही पडसाद उमटले. विरोधकांनी यावर चर्चेची मागणी करत आक्रमक पवित्रा घेतला. तर, हा राजकारणाचा विषय नसून महिलांच्या सन्मानाचा प्रश्न आहे. पोलिसांनी सक्रियपणे कारवाई केली आहे. खरात प्रकरणात ज्यांचा दुरान्वयेही संबंध असेल त्यांना सोडले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. तसेच, याविषयी मंगळवारी (दि. 24) सविस्तर निवेदन करणार असल्याचेही सांगितले.
काँग्रेस गटनेते विजय वडेट्टीवार यांनी अशोक खरात प्रकरणात सोमवारी सभागृहात स्थगन प्रस्तावाच्या सूचना देत कारवाईची मागणी केली. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी, शासन यात कारवाई करत असल्याचे सांगत स्थगन प्रस्ताव फेटाला. मात्र, या विषयाचे गांभीर्य लक्षात घेत विरोधकांना बोलण्याची परवानगी दिली.
या घटनेने महाराष्ट्राची बदनामी झाली असल्याने सभागृहात यावर सविस्तर चर्चा होऊ द्या, या पापात सहभागी होऊ नका. चाकणकर यांचा राजीनामा झाला; मात्र ज्यांचे ज्यांचे फोटो आले ते कधी राजीनामा देणार, असा प्रश्न नाना पटोले यांनी केला. सरकारकडून कारवाई सुरू आहे, गुन्हा दाखल असून, आरोपीला अटक करण्यात आल्याचे नार्वेकरांनी सांगितले. मात्र, चर्चेची मागणी करत विरोधक आक्रमक झाले.
त्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत माहिती दिली. भोंदूबाबा अशोक खरातने आपल्या कथित शक्तींचा दुरुपयोग करत दिशाभूल करून अनेक महिलांसोबत गैरव्यवहार, दुष्कृत्य केल्याचे समोर येत आहे. या प्रकरणात महिला समोर यायला तयार नव्हत्या; पण त्यांना योग्य पद्धतीने धीर दिल्यानंतर आता काही महिलांनी तक्रार केली असून, उर्वरित अजून काही महिला तक्रार करतील.