

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी परस्पर उमेदवार ठरविले. या प्रक्रियेत कोणालाही विश्वासात घेतले नाही, अशा तक्रारी राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षश्रेष्ठीकडे केल्या आहेत. त्याची दखल पक्षश्रेष्ठीनी घेतली असून सपकाळ यांना याबाबत विचारणा केली आहे.
विधान परिषदेच्या १७ जागांपैकी ९ जागांवर काँग्रेसने उमेदवार दिले. या उमेदवार निवडीबाबत काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत अधिकार प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना देण्यात आले होते. पण उमेदवारांची निवड करताना सपकाळ यांनी त्या विभागातील नेत्यांना काहीच विश्वासात घेतले नाही.
परस्पर उमेदवार जाहीर केले. पण यातील बहुतांश उमेदवारांनी आपले अर्ज कोणाशी चर्चा न करताच मागे घेतले. तसेच काही उमेदवारांनी माघार घेऊन शिंदे गटात प्रवेश केला. उमेदवारांच्या माघारीमध्ये 'अर्थ'कारण झाले असल्याचा आरोप झाले. त्यामुळे काँग्रेसची प्रतिमा खराब झाली असल्याची तक्रार काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, नाना पटोले आदी नेत्यांनी केली आहे.
महत्वाच्या निवडणुकीनंतर परस्पर निर्णय घेण्यात आल्याबद्दल पक्षश्रेष्ठींनी सपकाळ यांना जाब विचारला आहे. प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी नुकतेच जिल्हाध्यक्ष जाहीर केले. पण हे जिल्हाध्यक्ष निवड करताना त्या जिल्ह्याच्या काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना विश्वासात घेतले नाही, अशा तक्रारी या नेत्यांनी केल्या होत्या. तसेच जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या नेत्यांनी तर सपकाळ यांच्यावर जाहीर आरोप केले होते. त्यामुळे सपकाळ यांच्या एकाधिकाराबद्दल पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी गेल्या आहेत.
राज्यातील प्रमुख नेत्यांना दिल्लीत बोलावून घेतले आहे. माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिल्लीत बोलावून घेतले असून त्यांची बाजू ऐकली जाणार आहे. तसेच पटोले यांच्याकडे एका राज्याचे प्रभारी करणार असल्याचे सांगितले जात आहे.