

मुंबई: मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेत गेल्या दोन वर्षांत १९ हजार २६७ ज्येष्ठ नागरिकांनी मोफत तीर्थदर्शनाचा लाभ घेतला आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह राज्यातील विविध जिल्ह्यांतील ज्येष्ठ नागरिकांना उत्तर प्रदेशातील अयोध्या आणि बिहारमधील गया या तीर्थक्षेत्रांना सर्वाधिक पसंती असल्याचे यात्रेकरूंच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाली आहे.
तीर्थयात्रेसाठी लाभार्थ्यांना खासगी टूर कंपन्यांच्या बस तसेच भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाच्या (आयआरसीटीसी) माध्यमातून रेल्वेने तीर्थक्षेत्रांच्या लगतच्या स्थानकांपर्यंत नेण्यात येते.
महाराष्ट्रातील १६१ व अन्य राज्यांतील ८८ अशा एकूण २४९ तीर्थक्षेत्रांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत २८ सप्टेंबर २०२४ ते १ मे २०२५ या कालावधीत १६ हजार ६८७ ज्येष्ठ नागरिकांनी विविध तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतले.
१५ मे २०२६ ते २६ जुलै २०२६ या कालावधीत आणखी २ हजार ५८० लाभार्थ्यांनी तीर्थदर्शन केले. आतापर्यंत एकूण १९ हजार २६७ ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने १४ जुलै २०२४ रोजी सर्वधर्मीय ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना लागू केली होती.
कोणाला मिळतो योजनेचा लाभ
लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी आवश्यक आहे. ६० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक या योजनेसाठी पात्र आहेत. मात्र, लाभार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा अधिक नसावे.
सरकारकडून प्रत्येक लाभार्थ्यासाठी ३० हजार रुपयांपर्यंत निधी मंजूर केला जातो. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा लागतो. त्यानंतर जिल्हानिहाय समितीमार्फत लाभार्थ्यांची लॉटरी पद्धतीने निवड केली जाते.
अयोध्या, गयानंतर आता वाराणसी, सोमनाथकडे लक्ष
आगामी काळात वाराणसी, सोमनाथ, रामेश्वरम, द्वारका, कामाख्या देवी मंदिर, उज्जैन, केदारनाथ आणि बद्रीनाथ यांसारख्या प्रमुख तीर्थक्षेत्रांच्या यात्रांचे नियोजन प्रस्तावित आहे.